मुंबई दि. १५ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माता भिमाई आंबेडकर यांचा १७२ वा जयंती महोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.






सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे यांनी महामानवाच्या प्रतिमांना व विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी माता भिमाई आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार गुरुजी यांनी सुमधुर आवाजात धार्मिक विधी संपन्न केला. सरचिटणीस राजेश घाडगे, कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांनी आपले मौलिक विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी “माता भिमाईचा जन्म १४ फेब्रुवारी १८५४ साली ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे या गावात झाला त्यांचे वडील धर्माजी पंडित हे सुरवातीला मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांच्या माहेरची परिस्थिती श्रीमंतीची होती. इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी झाला, रामजी सकपाळ हे सुरवातीच्या काळात १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्स या सैनिक तुकडीत शिपाई म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांची परिस्थिती सर्वसामान्य होती त्यावेळी भिमाई ने मनाशी निश्चय केला की आपल्या माहेरच्या परिस्थितीशी जेव्हा सासरची परिस्थिती येईल त्यावेळी आपण आपल्या माहेरी पाऊल ठेवू, वेळेसोबत रामजी आंबेडकर यांना सुभेदार पद मिळाले व त्यांचीही परिस्थिती बदलली व दोन्हीही कुटुंब गुण्यागोविंदाने वाटचाल करू लागले. भिमाई आंबेडकर या धार्मिक कर्तव्यदक्ष व संस्कारी होत्या, रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती त्यातील भीमराव यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला व भारत देशाचे भाग्यच बदलले जणू या महामानवालाच जन्म देण्यासाठी माता भिमाई जन्माला आल्या होत्या परंतु बाबासाहेबांना आईचा जास्त सहवास लाभला नाही बाबासाहेब ५ वर्षाचे असताना इ.स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भिमाईंचे निधन झाले. माता भिमाई चा त्याग व विचार यांचा आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने माता भिमाईच्या मुरबाड येथील आंबेटेंभे या मुळगावी भेट देण्याचे प्रयोजन करणार आहोत” असे नमूद करून माता भिमाईला अभिवादन केले. सोबतच बौध्दाचार्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले असल्यामुळे संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार गुरुजी यांनी अधिक वेळ न घेता सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व बौध्दाचार्य शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांचे, उपासक उपासिकांचे, बौध्दाचार्य, बौध्दाचार्यांचे, विवाह मंडळ व संस्कार समितीचे कार्यकारिणी, पदाधिकारी, सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











