पुणे शहर पोलिस दलात एक हजार ६३३ पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी तब्बल एक लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे. पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी होणार आहे.






या भरतीत पोलिस अंमलदार, वाहनचालक आणि ३३ पोलिस बॅंडसमन अशा एकूण एक हजार ६३३ पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून, उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशांद्वारे दिल्या जाणार आहेत.
शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश असेल. या चाचणीसाठी १०० गुण असून, त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण व्यवस्था ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या निगरानीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन प्रक्रियेची पारदर्शकता वाढणार आहे.
लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांना मोबाइल वापरण्यास किंवा बाह्य संपर्क साधण्यास मनाई करण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वरिष्ठांपासून कनिष्ठ स्तरापर्यंत मानवी हस्तक्षेप टाळण्यात येईल. उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी केल्यास अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या (मोबाइल ७३९१०८२६११) क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
– संजय पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन).
चाचणीचे घटक (१०० गुण) –
उंची व छाती मोजणी
१०० मीटर धावणे
१,६०० मीटर धावणे (महिला – ८०० मीटर)
गोळाफेक
किमान पात्रता : ५० गुण आवश्यक
भरतीचे प्रमुख मुद्दे –
एकूण पदे : १,६३३
प्राप्त अर्ज : १,३९,०००
मैदानी चाचणी प्रारंभ : १६ फेब्रुवारी
तंत्रज्ञान : आरएफआयडी आणि सीसीटीव्ही निगरानी
चाचणी स्थळ : पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दल, गट क्रमांक २ मैदान.











