दक्षिण मुंबईच्या पायधुनी परिसरात २६ एप्रिल रोजी धक्कादायक घटना घडली होती. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले होते. अब्दुल्ला डोकाडिया यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलींचा यात मृत्यू झाला. यामुळे अन्नातील विषबाधा, रात्री फळे खावी की नाही? या विषयांवर बरीच चर्चा झाली. अखेर या घटनेतील सत्य समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार या चार जणांनी जे कलिंगड खाल्ले होते, त्यात उंदीर मारण्याचे विष मिसळले होते. फॉरेन्सिक लॅबने (FSL) मुंबई पोलिसांना गुरुवारी आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, पायधुनी परिसरात मृत पावलेल्या चारही जणांच्या अंतर्गत अवयवांमध्ये आणि कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे झिंक फॉस्फाइड आढळून आले आहे.






नेमके प्रकरण काय आहे?
पायधुनी येथील अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशा चार जणांचा २६ एप्रिल रोजी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी आदल्या दिवशी २५ एप्रिलच्या रात्री या चार जणांनी इतर नातेवाईकांसह बिर्याणीचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर स्वतःच्या घरी गेल्यानंतर रात्री १ ते १.३० च्या दरम्यान चौघांनी कलिंगड खाल्ले.
रविवारी (२६ एप्रिल) पहाटे चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. पहाटेच्या दरम्यान त्यांच्याच इमारतीमधील एका डॉक्टरने तपासल्यानंतर त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिवसभरात चौघांचाही मृत्यू झाला. लहान मुलगी झैनबचा रविवारी सकाळी १०:१५ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशाही उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. थोड्या वेळाने त्यांचाही मृत्यू झाला. रात्री १०.३० वाजता कुटुंबातील प्रमुख अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास
डोकाडिया कुटुंबातील चौघांचाही मृत्यू संशयास्पदरितीने आणि रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर झाल्यामुळे या प्रकरणाची बातमी देशभर पसरली. यावर अनेक अंगानी चर्चा घडून आल्या. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि चारही जणांचे शवविच्छेदन केले. तसेच डोकाडिया यांच्या घरातून अर्धवट खालेल्या कलिंगडाचे तुकडे, इतर खाद्यपदार्थ, मसाले आणि किचनमधील इतर बाबी ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवल्या.
फॉरेन्सिक अहवालातून कोणती बाब समोर आली?
एफएसएल अधिकाऱ्यांनी सांगितले की, झिंक फॉस्फाइड अत्यंत विषारी असून डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमागे हेच कारण असू शकते. झिंक फॉस्फाइडचा वापर उंदरासारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. द इंडियन एक्सप्रेसला फॉरेन्सिक पथकाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. चारही मृतांच्या शरीरात आणि कलिंगडामध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आले आहे.
कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यूला कीटकनाशके जबाबदार? अन्न सुरक्षा विभागाने काय म्हटले? पायधुनी मार्केटमधून कलिंगड गायब
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, “झिंक फॉस्फाइड हे सहसा पावडरच्या स्वरुपात असते. याचा अर्थ असा की, कलिंगड कापल्यानंतर त्यावर पावडर टाकली असावी. त्यानंतर कलिंगडचे सेवन केले गेले. मात्र नेमके काय घडले असावे, हे शोधून काढण्यास पोलीस अधिक सक्षम आहेत.”
मुंबई पोलिसांचे पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीबाबत मागे माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, शवविच्छेदनादरम्यान चौघांच्या शरीरातून जे नमुने (व्हिसेरा) संकलित करण्यात आले, ते रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले गेले. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी फॉरेन्सिक आणि अन्न विभाग संयुक्तपणे चौकशी करत आहे. कुटुंबातील सदस्यांनी खालेल्या कलिंगडमध्ये काही बाह्य विषारी पदार्थ किंवा भेसळ होती का? याचाही तपास राज्याचा अन्न व औषध प्रशासनाकडून केला गेला.
जे. जे. रुग्णालय डॉक्टरांनी हे सांगितले होते?
सर जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले होते की, डोकाडिया कुटुंबियांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची लक्षणे नेहमीच्या अन्नविषबाधेसारखी नव्हती. इतक्या वेगाने आणि तीव्रतेने प्रकृती खालावणे हे सामान्य नाही. हे काहीतरी वेगळ्या म्हणजे कदाचित विषारी किंवा रासायनिक घटकाच्या संपर्काचे संकेत देत आहे. कलिंगड हे हानिकारक फळ नाही तसेच दिवस असो वा रात्री खाल्ल्याने गंभीर आजार किंवा मृत्यू होतो याचा कोणताही पुरावा नाही.












