मुंढर कातकिरी येथे श्रमदानातून ७०० समतल चरांची निर्मिती

0

गुहागर दि. २९ (रामदास धो. गमरे) ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील मुंढर खुर्द येथे पाणी अडवा, पाणी जिरवा या सामाजिक भावनेतून प्रेरित होऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून डोंगर उतारावरील पडीक जमिनीवर तब्बल ७०० समतल चरांची निर्मिती करण्यात आली.

कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट समुद्रात वाहून जाते यामुळे जमिनीची धूप होऊन शेतीचे नुकसान होते तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, या पार्श्वभूमीवर मुंढर खुर्द गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या झऱ्याची पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

अधिक वाचा  पुण्यात ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, लाईव्ह कॉन्सर्ट अन् राहुल गांधींचा थेट संवाद

ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील मुंढर खुर्द येथील श्री. क्षेत्रफळ ग्रामस्थ विकास मंडळ व श्री. क्षेत्रफळ विकास मंडळ, मुंबई यांनी एकत्र येऊन क्षेत्रफळ देवस्थान परिसरातील खोंडी येथील पडीक जमिनीवर डोंगर उतारावर हे समतल चर तयार केले. या समतल चरांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजल पातळीत वाढ होणार आहे. या श्रमदान उपक्रमाची विशेष बाब म्हणजे मुंबई व इतर शहरांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कोकणवासी ‘एक दिवस गावासाठी’ या भावनेतून आपल्या गावी येऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या उपक्रमात मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळ मिळून सुमारे २०० ते २५० पुरुष व महिलांनी दिवसभर श्रमदान केले.

अधिक वाचा  कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?

सदर प्रसंगी सौ. भक्ती धनावडे (उपसरपंच), प्रतीक जाधव (विस्तार अधिकारी, कृषी), सुरेश गोरे (ग्रामपंचायत अधिकारी), किरण धनावडे (पोलीस पाटील) यांच्यासह दोन्ही मंडळांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.