विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चर्य महाविकास आघाडी आणि महायुतीने केला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने तर थेट दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पाचारण केले आहे. आज (8 नोव्हेंबर) महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांची जाहीर सभा झाली. दरम्यान, शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.






महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे
आपल्या सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं. 20 नोव्हेंब रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.
शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले?
अमित शाह यांनी यावेळी जनतेला अनेक आश्वासनं दिली. शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे स्मारक बनवू. शरद पवार यांच्याकडे 10 वर्षे सत्ता होती. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी खोलली, असा दावा अमित शाह यांनी केला.
निवडणुकीच्या निकालानंतर नेमकं काय होणार?
या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपा महायुतीच्या रुपात एकत्र निवडणूक लढवत आहेत. सत्ता आल्यास राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे महायुतीचे धोरण अद्याप समोर आलेले नाही. मात्र सध्याच्या विधानसभेत भाजपाचे सर्वाधिक मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदावर आहेत. सर्वाधिक आमदार असूनही भाजपाला मुख्यमंत्रिपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत भर सभेत अमित शाह यानी केलेल्या विधानाला चांगलेच महत्त्व आले आहे.











