निवडणुकीआधीच भाजपाच्या १०० नगरपरिषद सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

0

निवडणुकीआधीच भाजपाच्या १०० नगरपरिषद सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरपरिषद सदस्य बिनविरोध निवडून आले. रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती देताच विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत आणि घराणेशाहीच्या राजकारणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक नेत्यांनी भाजपावर सत्तेचा उघडपणे गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. विरोधकांकडून सरकारवर नेमके कोणते आरोप केले जात आहेत? त्यामागील कारणे काय?

विरोधकांचे सरकारवर गंभीर आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर सत्तेचा उघडपणे गैरवापर केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “त्यांनी बिहारमध्ये ‘जंगलराज’ हा शब्द वापरला, पण इथे ते विरोधकांच्या उमेदवारांना धमकावत आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या जाहीर भाषणातून आम्हाला मदत करा, विकास निधी देऊ, असे सांगत असल्याचा आरोप करत ही सौदेबाजी असल्याचे म्हटले.

“मला वाटते ही सौदेबाजी किंवा धमकी आहे. निधी हा अजित पवार यांच्या घरचा नाही. निधी करातून येतो, घरातून नाही,” असे ते म्हणाले. अजित पवार मतांसाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोग काय करतोय?, असा प्रश्नही त्यांनी केला. शनिवारी मालेगावातील एका सभेत केलेल्या भाषणावर दानवे यांनी टीका केली. तिथे अजित पवार म्हणाले होते, “माझ्या १८ उमेदवारांना तुम्ही निवडून देण्याची खात्री दिल्यास, मी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यास तयार आहे. मतं तुमच्या हातात आहेत, निधी माझ्या हातात आहे.”

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

अजित पवार यांच्या या विधानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नेते अनेकदा आपल्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ ते गैरकृत्य करत आहेत किंवा मतदारांना आमिष दाखवत आहेत असा होत नाही, असे त्यांनी सांगितले.

नगरपरिषद सदस्यांच्या बिनविरोध निवडीवरील आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

रविंद्र चव्हाण यांच्या माहितीनुसार, बिनविरोध निवडून आलेले ४ नगरपरिषद सदस्य कोकण विभागातून, ४९ उत्तर महाराष्ट्रातून, ४१ पश्चिम महाराष्ट्रातून, तर मराठवाडा आणि विदर्भ विभागातून प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर होणार आहेत.

अधिक वाचा  असंख्य दिव्यांगांच्या आयुष्यात नवी पहाट! पुन्हा उमलले हासू; ना. चंद्रकांतदादा यांची अशी ही संवेदनशीलता

फडणवीस यांनी भाजपावरील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. फडणवीस म्हणाले की, भाजपा लोकशाही आणि निवडणूक यंत्रणेवर विश्वास ठेवतो आणि त्याचे कठोरपणे पालन करतो. बिनविरोध निवडणूक ही केवळ भाजपा नेतृत्वावरील लोकांचा विश्वास आणि पक्षाच्या विकासकामांवरील लोकांचा विश्वास दर्शवते, असे त्यांनी नमूद केले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे हे विधान त्यांच्याच पक्षाच्या सहकाऱ्यांनी अलीकडे केलेल्या विधानांच्या पूर्णपणे विपरीत आहे.

गेल्या आठवड्यात भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली येथील भाजपा कार्यकर्त्यांना ‘खर्चाची चिंता करू नका’, असे सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला होता. “आम्हाला खर्चाचे तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागतील,” असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की ते पक्षाच्या कार्यालयात मंडप उभारण्याबद्दल बोलत होते, मतदारांना आमिष दाखवण्याबद्दल नाही. फेब्रुवारीमध्ये भाजपाचे आणखी एक मंत्री नीतेश राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. ते म्हणाले होते की, ‘भाजपाशी संबंध नसलेल्या गावांना विकासनिधी मिळणार नाही. महायुतीत सामील व्हा आणि तुमची कामे करून घ्या, फक्त त्यांनाच निधी मिळेल.”

भाजपावर घराणेशाहीचा आरोप

विरोधकांनी भाजपावर घराणेशाहीचे राजकारण वाढवल्याचाही आरोप केला आहे. सपकाळ यांनी भाजपा नेत्यांच्या बिनविरोध निवडून आलेल्या नातेवाईकांच्या लांब यादीकडे लक्ष वेधून प्रश्न उपस्थित केला. “पैसा आणि बाहुबली शक्तीसमोर लढणे विरोधकांना कठीण होत आहे. आता ते घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत नाहीत का?,” असा प्रश्न त्यांनी केला.

अधिक वाचा  सकल हिंदू समाज अभिमानाची लगबग अन् भव्य सोहळाही!; निमंत्रण हिंदुत्वाच,स्नेहाचं! आपुलकीचं ‘गो-माते’च्या नामकरणाचं

जामनेरमध्ये भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची काँग्रेसच्या रूपाली लालवाणी आणि राष्ट्रवादीच्या इतर दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे नगर परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. दोंडाईचा-वरवाडे नगर परिषदेत, मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल बिनविरोध अध्यक्षपदी निवडून आल्या, कारण विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचे नामांकन रद्द झाले. भावसार यांनी मंत्र्यांवर त्यांचे नामांकन रद्द करण्यासाठी दबाव निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

चिखलदरा नगर परिषदेतून आणखी एक हाय-प्रोफाइल बिनविरोध निवड झाली. फडणवीस यांचे चुलतभाऊ आल्हाद कलोती अध्यक्ष झाले, ज्यामुळे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. भाजपाचे इतर लोकप्रतिनिधी, ज्यांचे नातेवाईक एकतर निवडणुकीच्या रिंगणात आहेत किंवा बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्यात मंत्री आकाश फुंडकर, संजय सावकारे, अशोक उईके, माजी खासदार रामदास तडस, आमदार मंगेश चव्हाण आणि प्रकाश भारसाकळे यांचा समावेश आहे.