





लोकसभा निवडणुकीपाठोपाठ बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील नेत्रदीपक यशात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पडद्यामागून बजावलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे. भाजप श्रेष्ठींनी विनोद तावडे यांच्याकडे ११ सप्टेंबर २०२२ बिहारच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली. पण त्यापूर्वी महिन्याभर आघीत पूर्वी नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडून बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले होते.
लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीत नितीश कुमार दाखल झाले होते. पण लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना नितीश कुमार यांना परत ‘रालोआ’त आणण्यात तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारला बळ देण्यासाठी तावडे यांनी काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये आणले, त्यांच्या प्रयत्नांमुळे आरजेडीच्या आमदारांनी नितीश कुमार सरकारच्या बाजूने मतदान केले.
तावडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी बिहारची पक्ष संघटना नव्याने सक्रिय केली. प्रत्येक बूथवर पाच सक्रिय कार्यकर्ते नेमून लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटन सज्ज केले. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व जातींचा पुरतेपणाने विचार करून भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभेला सामोरे जाताना बिहार सरकारच्या धोरणांवर बारकाईने लक्ष ठेवून योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करवून घेतली.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग वृद्धांसाठीचे निवृत्ती वेतन 400 रुपयांवरुन अकराशे रुपये करायला लावले. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींची संख्या एक कोटीने वाढली. या प्रयत्नांमुळे बिहारमध्ये भाजप-रालोआला लोकसभेच्या ४० पैकी ३० जागा जिंकणे शक्य झाले. उत्तर प्रदेशात निराशाजनक कामगिरी बजावणाऱ्या भाजपला बिहारच्या या संख्याबळामुळे केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणे शक्य झाले.
भाजप-‘रालोआ’च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशात विनोद तावडे यांचा नितीश कुमार यांच्याशी असलेला उत्तम समन्वय महत्त्वाचा ठरला. विनोद तावडे यांनी संघटनेच्या रचनेला प्राधान्य देत राजकीय धोरण आणि समाज माध्यमांवर पक्षाच्या प्रचार-प्रसारावर भर दिला. रफ्तार पकड चुका है बिहार ही टॅगलाईन समाज माध्यमांवर लोकप्रिय केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे नियोजन करताना भाजपमधील विविध समाजाच्या नेत्यांच्या बिहारच्या कोणत्या भागात सभा व्हायला हव्या याची आखणी केली.













