दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) अलर्ट झाले असून, कोंढवा आणि मुंब्रा परिसरात मंगळवारी छापेमारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याचा संबंध दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील प्रकरणाशी आहे का, याचीही एटीएसकडून चौकशी सुरू आहे.






एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसच्या तपास पथकाने कोंढवा आणि मुंब्रा येथे एकाचवेळी शोधमोहीम राबवून दोन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. या कारवाईचा संबंध कोंडव्यातील संशयित जुबेर हंगरगेकर या व्यक्तीच्या तपासाशी असल्याचे सांगण्यात आले.
आयटी अभियंता जुबेर याला एटीएसने कोंढवा परिसरातून नुकतीच अटक केली होती. जुबेर हा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्याचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध नसल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या तो एटीएसच्या कोठडीत असून, त्याची कोठडी १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
एटीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “जम्मू-काश्मीर, फरीदाबाद आणि दिल्लीतील प्रकरणांचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का, हे पडताळून पाहण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही. ही नियमित तपासाची प्रक्रिया आहे.,” असेही त्यांनी सांगितले. ही संपूर्ण चौकशी एटीएसकडून उच्चस्तरीय पातळीवर केली जात आहे.पुढील काही दिवसांत या तपासातून महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













