ऐतिहासिक वारसा लाभलेले अहिल्यानगर सध्या तणावपूर्ण आणि अस्थिर वातावरणातून जात आहे. दिवाळीसारख्या प्रमुख सणाच्या उंबरठ्यावर निर्माण झालेली ही परिस्थिती जिल्ह्याच्या सामाजिक सलोख्यावर आणि आर्थिक वातावरणावर सावट घालणारी ठरत आहे. गेल्या काही महिन्यात राजकीय समीकरणात झालेल्या उलथापालथीमुळे, सामाजिक आणि धार्मिक तणाव वाढत असून, शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.






अतिवृष्टी आणि तणावग्रस्त वातावरण
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्याचवेळी पैगंबरांच्या नावाची विटंबना झाल्याच्या प्रकरणामुळे शहरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची सभा, त्यानंतर एका महामानवाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, आणि शेवटी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा या घटनांच्या मालिकेमुळे शहरातील शांततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पोलिसांवर आता सुव्यवस्था राखण्याचे मोठं दडपण आलं
प्रशासन आणि पोलिसांवर आता सुव्यवस्था राखण्याचे मोठं दडपण आलं आहे. सणासुदीच्या काळात ही जबाबदारी आणखी वाढली आहे. नागरिक आणि व्यापारी वर्ग दोघांमध्येही अशा घटना मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी होत आहेत का? असा सवाल निर्माण झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचं बदलतं राजकीय समीकरण
नगर जिल्हा सुसंस्कृत आणि संतुलित राजकारण्यांसाठी ओळखला जात होता. मात्र अलीकडच्या काही महिन्यांत झालेल्या राजकीय बदलांमुळे चित्र पालटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, आणि त्यांच्या पाठोपाठ आमदार संग्राम जगताप यांनीही हिंदुत्ववादी भूमिकेकडे कल दर्शवला. एका विशिष्ट धर्माविषयी सातत्याने टीका करून सामाजिक तणाव वाढवणाऱ्या त्यांच्या वक्तव्यांवर टीकास्त्र सुरू आहे. नागरिकांच्या मते, विकासासाठी निवडून दिलेल्या आमदारांना आता विकासापेक्षा राजकीय संदेशवहनात रस वाढल्याचे दिसून येत आहे.
बाजारपेठेवर संकटाची छाया
दिवाळीसारख्या सणांच्या काळात बाजारपेठेत नेहमी उल्हासाचे वातावरण असते. मात्र, सध्या व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण आहे. ऑनलाईन खरेदीकडे वाढता कल आणि शहरातील अशांतता यामुळे प्रत्यक्ष व्यापारात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एक उद्योजक म्हणाले, सणासुदीच्या काळातच वर्षभरातील कमाई होते, पण आता लोक बाहेर पडायला घाबरत आहेत. अशा परिस्थितीत लवकरात लवकर स्थैर्य प्रस्थापित झाले नाही तर नगरची पारंपरिक बाजारपेठ ओस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओवेसींची सभा आणि जलीलांचे वक्तव्य
९ ऑक्टोबर रोजी मुकुंदनगर येथे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. या सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार जगताप व राणे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला. मात्र, जगताप समर्थकांनी संयम दाखवला आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. राजकीय वाद वाढत गेले तर भविष्यात अशा संघर्षांचा परिणाम थेट नागरिकांवर आणि व्यापारावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
आमदारकीच्या शपथेचा विसर?
आमदार म्हणून संग्राम जगताप यांनी घेतलेल्या शपथीनुसार त्यांना संविधानाशी खरी निष्ठा राखणे आणि सर्व धर्म, जातींच्या समानतेचा आदर राखणे अपेक्षित आहे. मात्र, अलीकडच्या विधानांनी हा शपथविधी केवळ औपचारिक ठरला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संविधानाच्या कलम 188 नुसार द्वेषभावना निर्माण करणारे वक्तव्य हे थेट संविधानविरोधी ठरते, असे कायदे विशारद सांगतात.
काय करायला हवे?
अहिल्यानगरला पुन्हा शांततेच्या मार्गावर आणायचे असेल, तर सत्तासंघर्ष, धर्मीय वाद आणि द्वेषपूर्ण भाषण यांना थारा न देता सामाजिक एकोपा आणि विकास या दोन गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन अफवांना आळा घालावा, तर नागरिकांनीही संयम आणि जबाबदारीने वागावे. अहिल्यादेवींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहरात त्यांच्या सुशासन, शांतता आणि लोककल्याणाच्या मूल्यांचे प्रतिबिंब पुन्हा दिसणे, हीच काळाची गरज आहे. शांतता आणि एकोपा हाच जिल्ह्याच्या प्रगतीचा खरा पाया आहे.











