पुणेकरांचं टेन्शन वाढले! ‘या’ धरणाच्या पाण्यानं बदलला रंग, हिरवं पाणी पाहून स्थानिकांमध्ये घबराट

0

पुण्यामध्ये एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका धरणामधील पाण्याला अचानक हिरवा रंग आला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र अचानक धरणाचं पाणी हिरवं कसं झालं याबद्दलचं गूढ कायम आहे. हा सारा प्रकार पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणामध्ये घडला आहे.

स्थानिक घाबरले

मिळालेल्या माहितीनुसार, भाटघर धरणाच्या परिसरातील काही ठिकाणी पाण्याला अचानक हिरवा रंग आला आहे. धरणातील पाणी रातोरात हिरवं झाल्याचं पाहून स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.

अधिक वाचा  ‘पल्टीमार’ ते जुळवाजुळवीचे तज्ज्ञ, महिला सशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचा प्रवास; २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा!

पाण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

लाखो लोक धरणातील ज्या पाण्यावर अवलंबून आहेत तो साठा अशाप्रकारे हिरवा पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

नागरिकांना हवाय पादर्शक तपास

लाखो लोक ज्या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत त्या धरणाचं पाणी हिरवं कसं पडलं याबद्दल प्रशासनाने तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करावी, अशी नागरिकांची आग्रही भूमिका आहे.

कशामुळे पाणी हिरवं झालं?

भाटघर धरण शाखा अभियंता गणेश टेंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मत्स्य विभागाने धरणात काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जलाशयात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि परिणामी पाण्याला हिरवा रंग दिसून येतो. तो काही कालावधीत पूर्ववत होतो.”

अधिक वाचा  राज्यात 72 तासाचा अलर्ट मोठं संकट! सांगली सोलापूर मध्ये 1 ते 4 घरी थांबा हवामान विभागाचा इशारा काय?

तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना

या प्रकरणासंदर्भात धरण शाखा अभियंत्याने संभाव्य स्पष्टीकरण दिलं आहे. असं असलं तरी या साऱ्या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी त्वरित कारवाई केली आहे. जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिकांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश खरात यांनी दिले आहेत.

अनेक धरणांमधून विसर्ग

पुण्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. आठवड्याभरापूर्वीच मावळातील आणि मुळशी येथील दहा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून कासारसाई धरणाच्या सांडव्यातून नालापात्रात 540 क्यूसेक्स इतका वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुणे वेधशाळेने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले तर परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त केला जात आहे. तरी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असं आवाहन कासारसाई पाटबंधारे विभागाने नागरिकांना केलं आहे.

अधिक वाचा  पुणे मेट्रोच्या लाईन 4 आणि 4 Aचे सादरीकरण 4 वर्षात प्रकल्प पूर्तीचा संकल्प; मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग!- ना. चंद्रकांतदादा पाटील