बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान, आज या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला कोर्टाने मोठा दणका दिलेला असल्याचं देखील आता समोर आलं आहे.
वाल्मिक कराड याने या प्रकरणी आपण निर्दोष असून दोषमुक्तीचा अर्ज दाखल केलेला होता. या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा हा अर्ज आता कोर्टाने फेटाळला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोर्टाने कराडच्या दोषमुक्तीच्या याचिकेला फेटाळून लावल्याने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या गुन्ह्यातून सुटका करून घेण्याच्या कराडच्या प्रयत्नांना खीळ बसली असून, त्याची कायदेशीर अडचण आणखी वाढली आहे. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर उज्ज्वल निकम हा खटला पुढे लढवतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामागे एक प्रमुख कारण आहे. काय आहे ते कारण?
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आरोपींनी निर्घृण हत्या केली होती. प्रकरणात सुरुवातीलाच नाही तर प्रकरण उघड झाल्यानंतर ही पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले होते. प्रकरणात विरोधकांनी आणि जनतेने लढा दिल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. अनेक पोलिसांची बदली झाली. तर याप्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत असल्याचे व्हिडिओ, फोटो आणि मोबाईलच्या संबंधातून पुढे आले. प्रकरणात राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांना बाजू मांडण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात त्यांनी आरोपींविरोधात जोरदार युक्तीवाद केला.
राज्यसभेवर निकम यांची वर्णी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावासमोर खासदार ही उपाधी लागणार आहे. त्यांनी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब खटला आणि राज्यातील इतर गाजलेल्या खटल्यात कायदा क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासाची चुणूक दाखवली आहे. आता खासदार असताना संतोष देशमुख खून खटल्यात बाजू मांडता येईल का, असा सवाल करण्यात येत आहे. कायदा तज्ज्ञांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तर काही राज्यसभेचे खासदार जे विधीज्ञ आहेत, ते कोर्टात बाजू मांडत असल्याने निकम हे पण तोच मार्ग निवडतील अशीही चर्चा आहे.
वाल्मिकचा अर्ज फेटाळला
संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींनी दोष मुक्तीसाठी अर्ज केले होते. यापुर्वी वाल्मीक कराडने दोष मुक्तीसाठी अर्ज केला होता. वाल्मीक कराडने जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. आरोपी दोष मुक्तीसाठी स्वतंत्र अर्ज करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपींचे दोष मुक्तीचे अर्ज फेटाळण्यात आले. संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. प्रकरणात 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल.