अक्षय कुमारच्या चित्रपटांबद्दल दररोज विविध प्रकारच्या बातम्या येत राहतात. आता खिलाडी कुमारच्या ‘केसरी २’ चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ‘केसरी २’ च्या निर्मात्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चित्रपटात तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे म्हणणे आहे की ‘केसरी २’ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राज्याचे योगदान योग्यरित्या दाखवले गेले नाही, त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांखाली चित्रपटाच्या ७ निर्मात्यांवर विधाननगर दक्षिण पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चा आरोप आहे की अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ मध्ये बंगालच्या मुख्य स्वातंत्र्यसैनिकांची, विशेषतः क्रांतिकारक खुदीराम बोस आणि बरींद्र कुमार घोष यांची प्रतिमा चुकीची दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात खुदीराम बोस यांना खुदीराम सिंह म्हणून दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर बरींद्र कुमार घोष यांना अमृतसरचे बिरेंद्र कुमार म्हणून दाखवण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस नेते कुणाल घोष यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.
याशिवाय ‘केसरी २’ च्या निर्मात्यांवर राज्याच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये विकृत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाद्वारे बंगालच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुणाल घोष यांच्या मते, ही केवळ चूक नाही. आंदोलनात बंगालची भूमिका पुसून टाकण्याचे हे षड्यंत्र आहे. चित्रपटाबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांनी असेही म्हटले आहे की अशा चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र कसे मिळाले?
कृपाल घोष यांनी असाही दावा केला आहे की निर्मात्यांनी चित्रपटात त्यांच्या पात्राऐवजी कृपाल सिंग नावाचे एक काल्पनिक पात्र दाखवले आहे. तृणमूल काँग्रेस नेत्यांनी केंद्राकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. एवढेच नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चित्रपटाचे नाव न घेता चित्रपट निर्मात्यांना टीका केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात बंगाली क्रांतिकारकांनी बजावलेल्या भूमिकेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही याचा निषेध करतो.”