राज्यात पूर्वमोसमी पावसाचा धडाका सोमवारीही सुरुच राहिला. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (ता. २०) तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावरही मंगळवारी मुसळधार सरी कोसळू शकतात. यासह राज्याच्या उर्वरित भागांतही यलो ऍलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सकाळी उन्हाचा चटका व दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. पावसामुळे उकाडा व तापमानात चढ-उतार सुरु आहेत. सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळराव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, बीड, जालना, बुलडाणा व वाशीममध्ये सोमवारी पावसाची नोंद झाली.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान पुन्हा एकदा ब्रह्मपुरी येथे नोंदवण्यात आले. ब्रह्मपुरी येथे ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. याशिवाय चंद्रपूर, नागपूर, जळगाव येथे तापमान ४० अंशांहून अधिक होते. मात्र विदर्भाचा अपवाद वगळता उर्वरित राज्यातील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.
मंगळवारचा अंदाज काय?
मंगळवारी तळकोकण, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव व लातूर येथे हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
नाशिकमध्ये पावसाचा कहर
पूर्वमोसमी पावसामुळे गेल्या १४ दिवसांत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवळपास सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे भाजीपाला पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे (३४.८-२४), अहिल्यानगर (३२.८-२२.४), धुळे (३९-१९.५), जळगाव (४०.२-२५.७), जेऊर (३४.५-२२.५), कोल्हापूर (३३.१-२१.८), महाबळेश्वर (२६.३-१८.५), मालेगाव (३५.४-२२.२), नाशिक (३३.२-२४.७), निफाड (३४.६-२३.८), सांगली (३३.३-२१.८), सातारा (३३.३-२१.८), सोलापूर (३६.८-२४.४), डहाणू (३६-२७.७), रत्नागिरी (३४.३-२४.६), छत्रपती संभाजीनगर (३३-२४), धाराशिव (३६.२-२०), परभणी (३७.१-२४.५), अकोला (३९.८-२६.६), अमरावती (३८.४-२६.७), बुलढाणा (३५.४-२५), ब्रह्मपुरी (४१.२-२७.९), चंद्रपूर (४१-२६.६), गडचिरोली (३९.२-२५), गोंदिया (३७.६-२५.८), नागपूर (४०.८-२८.३), वर्धा (३९.५-२८.२), यवतमाळ (३९-२५.४).