सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गुरुवारी (ता.२०) विधान परिषदेमध्ये रणकंदन झाल्यानंतर आज संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे काम यापुढे विरोधकांच्या सहमतीनेच होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आश्वस्त केले. दरम्यान, या बैठकीत दिशा सालियन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोन्ही सभागृहांत त्यावर चर्चा होणे योग्य नसल्याची नाराजी शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केल्याचे समजते.
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या दालनात यासंदर्भात झालेल्या या बैठकीला सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब उपस्थित होते.
भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून दोन्ही सभागृहांत चर्चा घडवून आणली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशाप्रकारे ही चर्चा होणे योग्य नसल्याचे मत ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. तसेच विधान परिषदेच्या कामकाजाच्या पद्धतीवर सभागृह सुरु झाल्यापासून विरोधकांनी वारंवार आक्षेप घेतला होता.
कार्यक्रम पत्रिकेनुसार कामकाज होत नसल्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतही सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्याने विरोधकांचा आवाज क्षीण असल्याने त्यांचे मत विचारात घेतले जात नसल्याचा तीव्र आक्षेप घेण्यात येत होता.
या बैठकीत परब यांनी हेच मुद्दे पुन्हा उपस्थित करत परिषदेत सभागृहात कोणीही मंत्री कोणत्याही विभागाच्या प्रश्नांना उत्तर देत असल्यावरही आक्षेप घेतला. दोन दिवसांपूर्वी नगरविकास विभागाच्या ठाणे कोस्टल रोडच्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उत्तर देत असताना मंत्री शंभुराज देसाई यांनी हस्तक्षेप करत त्या प्रश्नाचे उत्तर दिल्याकडे परब यांनी लक्ष वेधले.
विश्वास-अविश्वास ठरावावरून आक्षेप
कामकाजासंदर्भात कोणतेही निर्णय घेताना सभागृहाची मान्यता घेतली जात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव विरोधकांना मांडू न देण्यासह गोऱ्हे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी अचानक विश्वास ठराव आणून बहुमताच्या जोरावर तो मंजूर केला. मात्र विरोधकांना त्यावरही मत व्यक्त करू न देण्यावर या बैठकीत ठाकरे गटाने आक्षेप घेतला.