पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात होणाऱ्या महाराजांच्या अपमानाच्या पा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की, ‘कोरटकर सारखा निर्लज्ज माणूस देश सोडून पळून जातो. यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना सुरु केली आहे की महाराजांचा अपमान करा आणि पळून जा. या विकृत माणसाला सरकारने सुरक्षा पुरवली. इंग्रज देखील औरंगजेब एवढे जुलमी आणि क्रूर होते. अपमान करा आणि पुरस्कार मिळवा असचं सुरु आहे.’
गृहविभाग झोपला होता का?
सपकाळ पुढे म्हणाले की, कोरटकर पळून जातो सरकार काय करत आहेत? तुमचा, देशाचा गृह विभाग झोपला होता का? कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडले आहे का? असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. दुसरीकडे माजी मंत्र्याचा लाडका मुलगा न सांगता पळून जातो त्याच विमान मागे बोलावून परत आणले जाते आणि महाराजांचा अपमान करणारा आरोपी पळून जातो. असं देखील सपकाळ म्हणाले आहेत.
प्रशांत कोरटकरचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्याचा हा फोटो जूना असल्याचा दावा काही जण करत आहेत. तर कोरटकरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आल आहेत. त्याला अद्यापही अटक झाली नसल्याने विरोधक सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत.
‘त्या’ वक्तव्यावर आजही ठाम
याच पत्रकार परिषदेत त्यांनी औरंगजेब आणि फडणवीस यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेब याच्या सारखा असल्याची टीका सपकाळ यांनी केली होती. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकारण जोरदार पेटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपकाळ यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर आता हर्षवर्धन सपकाळ कमालीचे आक्रमक झाले असून मी माझ्या विधानावर आजही ठाम असल्याचं सांगितले आहे. मी एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो ‘मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही ‘, असं सपकाळ म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी टीका ही कारभाराच्या अनुषंगाने असल्याचे स्पष्ट केले होते.