सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही; …..म्हणून त्यांनी घरात दंगल पेटवली, जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरा वार

0

नागपूरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून जवळपास अनेकांना अटक करण्यात आली आहे. नागपूरमधील विविध भागात संचारबंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपुरातील हिंसाचारावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. या हिंसाचारावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, स्वराज्य संकल्प शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती संभाजीनगरमधील वेरुळ येथील गढीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी उसळली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना औरंगजेबाची कबर ते नागपूरमधील हिंसाचारावर भाष्य केले.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही..नाही तर त्यांनी कबरीच्या दिवाबत्तीला पैसे आणि पोलिसांचा बंदोबस्त दिला नसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ घेऊन यावे मी त्यांच्या सोबत आताच निघतो असेही मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनोज जरांगे यांनृी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. मनोज जरांगे यांनी म्हटले की, शिक्षक शेतकरी विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत आणि हे जाती जाती मध्ये भांडण लावून आपले राजकारण करीत आहेत. मुख्यमंत्री सोंगाड्या आहेत त्यांच्या सोंगात आता जनतेने फसू नये असे आवाहन त्यांनी केले. जरांगे यांनी पुढे म्हटले की, राज्यात इतर ठिकाणी लोकांनी औरंगजेबाच्या कबरीला महत्व दिले नाही. म्हणून त्यांनी आपल्याच घरात दंगल पेटवली, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन