सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकाराच्या माध्यमातून उभारलेला व महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेला साखर उद्योग परत काही मूठभर नेत्यांच्या हातात एकवटत असल्याचे नवे चित्र पुढे आले आहे. एकूण गाळपापैकी तब्बल २७ टक्के गाळप या नऊ सहकारी व खासगी उद्योगसमूहांकडून होत आहे. सहकारातून खासगीकरण व त्यातूनही पुन्हा आता आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण असा प्रवास सुरू झाला आहे.
गत हंगामात राज्यात सहकारी व खासगी असे २०७ कारखाने सुरू होते. या नऊ समूहांकडे त्यातील ५० कारखाने आहेत. त्यांनी २ कोटी ९० लाख मे. टन गाळप केले आहे.
मूळचे कारखाने सहकारी व नंतरचे मात्र सोयीनुसार खासगी असेही चित्र समूहांमध्ये दिसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट संबंध नसली तर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा समूह काम करतो.
सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हे क्षेत्र व्यापले आहे. मोठे समूह झाल्याने काही फायदे होत असले तरी मूठभरांच्या हाती हा उद्योग एकवटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रमुख समूह गाळप क्षमता प्रत्यक्ष गाळप
अजितदादा ग्रुप ६४ हजार ८० लाख
विठ्ठलराव शिंदे २३ हजार ३६ लाख
बारामती अॅग्रो २८ हजार ३५ लाख
लातूर देशमुख-१ १९ हजार २८ लाख
पुणे ओंकार ग्रुप २९ हजार २५ लाख
लातूर देशमुख-२ १८ हजार २४ लाख
सोनहिरा १८ हजार २२ लाख
राजारामबापू १६ हजार २० लाख
भैरवनाथ समूह २० हजार १९ लाख
अथनी समूह १७ हजार १४ लाख
सहकारी व खासगी उद्योग समूहातील एकत्रिकरणाचा वेग पाहता एकल कारखान्यांना भविष्यात तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आर्थिक शिस्तीसह कारखाने पूर्ण क्षमतेने चालवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.
– विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक