पुणे : पैलवान शिवराज राक्षे याच्या रौद्रावतारामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले. पंचाचा निर्णय मान्य न झाल्याने त्याने पंचांची कॉलर पकडून लाथ मारली. मात्र माझी पाठ टेकलेली नव्हती, किंबहुना दोन्ही खांदे टेकलेले नव्हते. पंचांकडे दाद मागूनही त्यांना फेटाळल्याने मला राग अनावर झाला. त्यांनी माझ्यावर अन्याय केल्याने राग अनावर झाल्याने मी लाथ मारली, असे शिवराजने माध्यमांना सांगितले. शिवराजच्या वर्तनावर आणि पंचांच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवराजच्या आईनेही लेकावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली आहे.






वाडिया पार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ आणि अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे अंतिम तीन सामना संपन्न होण्याआधीच पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील सामन्यादरम्यान तुफान राडा झाला.
शिवराजची आई काय म्हणाली?
शिवराजच्या महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी सकाळपासून देवासमोर बसून प्रार्थना केली मात्र पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराजवर अन्याय झाली, अशी भावुक प्रतिक्रिया शिवराज राक्षेच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली.
शिवराजच्या कुस्तीचा निकाल चुकीचा दिला गेलाय. हवे तर पुन्हा कुस्ती खेळवावी. कायमच माझ्या लेकावर अन्याय का होतो? तो तिसऱ्यांदा विजेता होईल म्हणून त्याच्यावर अन्याय केलाय का? अशी विचारणा शिवराजच्या आईने केली.
शिवराजचे वडील काय म्हणाले?
शिवराजने पंचांना लाथ मारली, असे वारंवार सांगण्यात येते. पण चांगल्या पैलवानावर अन्याय करून त्याला बदनाम करण्याचे कारण काय? असा सवाल शिवराजच्या वडिलांनी विचारला.
मैदानात नेमकं काय घडलं?
पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात रोमहर्षक सामना सुरू असताना मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित करून सामना पृथ्वीराजने जिंकल्याचे घोषित केले. पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोषाला सुरुवात केली.
रागाने लालबुंद झालेल्या शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडून लाथेने मारले
त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडली. एवढ्यावरच न थांबता त्याने पंचांना लाथही मारली. शिवराज आणि पंचांमध्ये झटापट सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर मध्यस्थी केली.
माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले?
माझे दोन्ही खांदे टेकलेच नाहीत, माझी पाठ टेकलीच नव्हती, तुम्ही मला बाद कसे दिले? अशी विचारणा शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तुम्ही निर्णय देताना खेळ भावना दाखवली नाही, अशी तक्रार शिवराज राक्षे याने पंचांकडे केली. तसेच पंचांनी माझ्यावर अन्याय केल्याची भावना शिवराज राक्षेने बोलून दाखवली.











