पाच वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, याची प्रतीक्षा कायम आहे. त्यात आता महापालिकेवर प्रशासक कोण? निवडणुकीचे काम पाहणारे अधिकारी कोण? यासंबंधी माहिती निवडणूक आयोगाने महापालिकेकडून मागवली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जोरदार विजय झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर ता. २२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






या सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती जमा करण्याचे काम निवडणूक आयोगामार्फत सुरू करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासकांना पत्र पाठवून प्रशासकांचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांक, निवडणूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांक, निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अशी माहिती मागविली होती. निवडणूक आयोगाने मागितलेली माहिती पाठविण्याचे काम महापालिकास्तरावर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्च-एप्रिलमध्ये बिगुल वाजणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील, असे मानले जात आहे. भाजपच्या नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार प्रमुख पक्षही कामाला लागले आहेत.











