महाविकास आघाडी राहिली काय आणि तुटली काय… देवेंद्र फडणवीस यांचं खोचक उत्तर

0

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर पराभवाचं खापर फोडण्यात येत होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असून आघाडी राहील की नाही अशी चर्चा सुरू झालेली होती. ही चर्चा सुरू झालेली असतानाच महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाने राज्यातील सर्वच्या सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन आघाडीच्या ऐक्याला छेद दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटली असल्याचं सांगितलं जात आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी राहिली काय आणि फुटली काय? त्याच्याशी आम्हाला काय घेणं?; अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

अधिक वाचा  भारत जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश बनला; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, ‘या’ शहरात सर्वाधिक श्रीमंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी खोचक टोलेबाजी केली. त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या सर्व निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद आमच्यावर पाठी राहणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी काय रिकामटेकडा थोडीच आहे
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असं विधान केलं होतं. त्यावर आम्ही कुठे जायचं हे मिस्टर फडणवीस ठरवू शकत नाहीत, असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मी माझं मत व्यक्त केलं. त्यांच्या प्रत्येक मतावर बोलायला मी बांधिल नाही. ते रिकामटेकडे आहेत. मी काय रिकाम टेकडा थोडीच आहे? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी यांना हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर २८ मते कमी; इतर 2 विधेयकेही मागे घेतली

राऊत काय म्हणाले होते?
दरम्यान, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत एकत्र राहून महापालिकेच्या निवडणुका लढणार नसल्याची घोषणा आज सकाळी केली. मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला अजमवायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरमधील कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीत लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसत असतो. स्वबळावर लढून पक्ष मजबूत करायचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. का स्वबळावर लढू नये? लोकसभा आणि विधानसभेसाठी आघाडी केली होती. आघाडीत कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली जात नाही, असंही ते म्हणाले होते.

अधिक वाचा  पालघर जिल्ह्यात ‘आम्ही भारताचे लोक’तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा