…पण ठाकरे कुणाचेच नाहीत; गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

0

महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात नसणार आहे. त्यातच आता ठाकरे गटाने भाजपशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा सारा खटाटोप सुरू आहे, अशी टीका करतानाच पण ठाकरे कुणाचेच नाहीत, असा सल्लाही गुलाबराव पाटली यांनी भाजपला दिला आहे.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना तू राहतो का मी राहतो, असं म्हटलंय आज तेच ठाकरे त्यांची पप्पी घेत आहेत. आज ते स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी जात आहेत. आता ते काँग्रेसशी फारकत घेत आहेत. राष्ट्रवादीशी फारकत घेत आहेत. काही राष्ट्रवादीचे नेते नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात डबडं वाजणार आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

फडणवीस यांना सल्ला
विचारधारा सोडून काही लोक आमच्यापासून दूर गेले. आम्ही भगव्या झेंड्यासाठी फडणवीस यांच्यासोबत आलो. आता ते लोक पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडा विचार फडणवीस यांनी करावा. जेव्हा आपली गरज होती, जेव्हा आपला पक्ष अडचणीत होता, जेव्हा मोदींचं सरकार येण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, तेव्हा हे लोक कोणासोबत होते? आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत, तुमच्याशी गोड बोलत आहेत. पण हे कुणाचेच नाहीत. याचा निश्चितपणे विचार करावा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांना दिला आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

जो बुंद से गयी…
आपण आपली मूळ विचारधारा सोडली होती हे त्यांना आता कळायला लागलं आहे. पण जो बूंद से गयी वो हौद से नही आने वाली. ज्यांनी भगवा सोडला, त्यांनी पुन्हा भगवा पकडला की हात थरथरतात हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.