विकसित भारतासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण प्रतिभावान पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत : राज्यपाल

0

‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे माध्यम असले तरी पत्रकार नि:पक्षपाती असला पाहिजे. पत्रकारांकडून सत्य आणि नि:पक्षपाती वृत्तांकनामुळे भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होईल. नागरिकांपर्यंत सत्य पोचत नाही तोपर्यंत विकसित भारताचे लक्ष्य पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रतिभावान पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त पुण्यात आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ‘पुढारी’चे योगेश जाधव, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘पुण्यनगरी’चे भावेश शिंगोटे, मंदार फणसे, आदित्य जावडेकर, किरण जोशी, कल्पना जावडेकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ‘सर्व क्षेत्रात ‘एआय’मुळे शास्त्रीय विकास होणार आहे. पत्रकार संघटनेने पत्रकार दिनासाठी ‘एआय’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना निवडली आहे. आज ‘एआय’ माध्यमांसह उद्योगांमध्ये परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड महत्त्वाची आहे.’

‘एआय’ म्हणजे दुधारी तलवार – चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ‘एआय तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात क्रांती होताना दिसत आहे. पत्रकारिता क्षेत्रही त्याला अपवाद नाही. येत्या काळात ‘एआय’चा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. पण ‘एआय’ ही एक दुधारी तलवार असून, चांगल्या कामांसाठी त्याचा प्रभावी वापर व्हायला हवा.’

अधिक वाचा  डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी राजा माने

या वेळी राज्यपाल राधाकृष्णन यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्यासह ‘पुढारी’च्या स्मिता जाधव, ‘लोकमत’चे यदू जोशी, ‘न्यूज १८ लोकमत’चे विलास बढे यांना ‘संपादक व्रतस्थ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

विशेष पुरस्कार रुपेरी किनार फाउंडेशनच्या संस्थापक कल्पना जावडेकर, ‘एड्यूटेक’चे नीलेश खेडेकर यांना देण्यात आले. तसेच, हॅकेथॉनमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या महाविद्यालयांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.