शिक्षण हे अंधाराच्या वाटेवरून प्रकाशाकडे नेणारा मार्ग होय – लक्ष्मण भगत

0

मुंबई दि. ४ (रामदास धो. गमरे) “१९ व्या शतकात कर्मठ मनुवादी समाजव्यवस्था असल्यामुळे समाजातील सर्वच स्तर अंधश्रद्धा, कुप्रथा, चालीरूढी आणि गुलामीच्या जोखडाखाली अडकलेले होते अश्या वेळी कर्मठ मनुवादी व्यवस्थेला सुरुंग लावून तळागाळातील समाजाला मनुवादी जोखडातून मुक्त करण्यासाठी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांनी निकराचा लढा दिला, ज्योतिबा फुलेंनी त्यांची पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवले व पुण्यात भिडे वाडा इथे पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यावेळी कर्मठ मनुवादी समाजाने सावित्रीबाईंना भयंकर त्रास दिला शेणाचे गोळे, दगडधोंडे फेकून मारले परंतु ते सहन करून सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत लावली त्यामुळेच आज सर्वच समाजातील मुली, महिला शिक्षण घेऊन उच्चपदावर जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे म्हणूनच शिक्षण हे अंधाराच्या वाटेवरून प्रकाशाकडे नेणार मार्ग आहे” असे प्रतिपादन अध्यक्ष या नात्याने बोलत असताना लक्ष्मण भगत यांनी केले.

अधिक वाचा  सुनेत्रा पवारांचे भावूक ट्विट, “साहेबांचे आशीर्वाद माझ्यासह बारामतीकरांसाठी लाखमोलाचे…”; प्रकृतीसाठीही प्रार्थना

बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९४ वा जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार आणि मनोहर मोरे यांनी आपल्या सुमधुर वाणीने धार्मिक पूजाविधी संपन्न केला, मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी अत्यंत लाघवी व समर्पक भाषाशैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली तर समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी प्रस्तावित सादर करताना “सदर कार्यक्रम हा महिलांचा असून महिलांनीच या कार्यक्रमाला सुरवात केली पाहिजे” असे नमूद करीत त्यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकत महिलांना मार्गदर्शन केले. तद्नंतर उपकार्याध्यक्ष एच.आर.पवार बोलत असताना “महिलांनी सावित्रीबाई फुलेंचा आदर्श मनात घेऊन आचार, विचारात सावित्रीबाईंना सामावून त्यांचा वारसा अंगीकारला पाहिजे त्याचसोबत आपल्या बहुजन समाजातील महामातांना समजून त्यांचा अंगीकार केला पाहिजे तरच भावी पिढ्या घडवता येतील” असे नमूद करून सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मध्यवर्ती महिला मंडळ अध्यक्षा सुशीलताई जाधव, उपाध्यक्षा प्रमिलाताई मर्चंडे, दर्शन जाधव, प्राजक्ता प्रमोद तांबे, ज्योती तांबे, प्रज्ञाताई जाधव, योगिता उल्हास मोरे, सोनाली गायकवाड, वंदनाताई पवार, गौतमीताई पवार, आशाताई जाधव, धनश्री जाधव, सुशीला जाधव आदी मान्यवरांनी आपले मौलिक असे विचार मांडून माता सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतींस अभिवादन केले.

अधिक वाचा  केंद्रीय महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! कोणती रणनीती आखणार? ‘हे’ ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

सदर कार्यक्रमास शिवडी, सायन, भायखळा विभागातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या तसेच व्यवस्थापक मंडळाचे यशवंत कदम, शिवडी विभाग क्र. १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, श्रीधर जाधव, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, विश्वस्त मंडळाचे सदस्य आदी मान्यवर ही उपस्थित होते, सरतेशेवटी मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व महिलांचे, विश्वस्त मंडळाच्या सदस्यांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.