देवाभाऊंना शरद पवारांना मागे टाकण्याची नामी संधी; शरद पवारांचा चारवेळा मुख्यमंत्री तरीही आता हा विक्रम धोक्यात

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीचं नेतृत्त्व आता देवेंद्र फडणवीसांच्या हाती आलं आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षानं त्यांची गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. फडणवीस यांनी याआधी मुख्यमंत्रिपदाची टर्म पूर्ण केली आहे. राज्यात असा पराक्रम करणारे ते दुसरेच मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा विक्रम मोडण्याची संधी फडणवीस यांना आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर महाविकास आघाडी भुईसपाट झाली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची निवडणुकीत दाणादाण उडाली. शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप या सगळ्या पक्षांना फडणवीस यांनी शह दिला. शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा संघर्ष गेल्या दशकभरापासून सुरु आहे. त्या शीतयुद्धात फडणवीसांनी पवारांना मात दिली. त्यानंतर आता पवारांचा विक्रम मोडण्याची संधी फडणवीस यांच्याकडे चालून आली आहे.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षणावर गदा, राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; हा नियम सर्व ‘स्थानिक’ला लागू होणार का?

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी असलेलं आमदारांचं संख्याबळ पाहता ते मुख्यमंत्रिपदाची टर्म पूर्ण करु शकतात. तसं झाल्यास फडणवीस माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विलासराव देशमुख यांचा विक्रम मोडतील. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम काँग्रेसच्या वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. ते सलग ११ वर्षे ७८ दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले.

काँग्रेसच्या विलासराव देशमुख ७ वर्षे १२९ दिवस मुख्यमंत्रिपदी होते. १८ ऑक्टोबर १९९९ ते १८ जानेवारी २००३ आणि १ नोव्हेंबर २००४ ते ८ नोव्हेंबर २००८ या कालावधीत ते मुख्यमंत्रिपदावर होते. शरद पवारांनी ६ वर्षे २२१ दिवस मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते चारवेळा मुख्यमंत्री झाले. १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०, २६ जून १९८८ ते ४ मार्च १९९०, ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ आणि ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ असे सहावेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले.

अधिक वाचा  पुण्यात मेट्रोची क्षमता दुप्पट प्रवाशी संख्या 3 लाखांवर पोहोचणार; 6 लाख प्रवासी हाताळण्यासाठी सक्षम सहा डब्यांची मेट्रो खरेदी करणार

देवेंद्र फडणवीस आतापर्यंत ५ वर्षे १७ दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले. पहिली टर्म त्यांनी पूर्ण केली. पण दुसऱ्यांदा त्याचं मुख्यमंत्रिपद केवळ ३ दिवस टिकलं. आता फडणवीस यांच्याकडे असलेलं संख्याबळ ते ५ वर्षे सरकार चालवू शकतात. तसं घडलं तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत ते शरद पवार, विलासराव देशमुख यांना मागे टाकतील.