“2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी आमदारांची बेरीज वाढली तर.”, निकालाचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम? वाचा

0

महाराष्ट्र विधानसभेसाठी काल (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तरी प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येकी तीन घटक पक्षांमध्ये असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार कुणाचे असेल? हे तर ओघाने समोर येईलच. पण या निकालातून राज्याच्या राजकारणावर कोणते दूरगामी परिणाम होतील? राज्याचे राजकारणाची पुढची दिशा कशी असेल? यावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विश्लेषण केले आहे. एकूण सहा मुद्द्यांद्वारे त्यांनी विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण केले आहे.

ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६५ ते ६६ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे चार ते पाच टक्के अधिक मतदान झाल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. याचे दोन अर्थ निघतात. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन संघ परिवाराने केले होते. त्याचे परिणाम दिसत आहेत, असे म्हणता येऊ शकते. त्याचवेळी मोठ मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचाही परिणाम झाला असावा, असे म्हणता येऊ शकते.

अधिक वाचा  ब्राम्हण महासंघाकडून दहावी, बारावी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

दुसरा मुद्दा असा की, महिला मतदार मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी मतदान करताना दिसत होत्या. याचा अर्थ लाडक्या बहिणींनी काम केले का? याचेही उत्तर २३ तारखेला आपल्याला मिळेल. पण ज्याअर्थी महिला मतदार मोठ्या प्रमाणात पुढे आल्या त्याअर्थी काही वर्षांपासून मतदारांना लाभार्थी करण्याचा सुरू असलेला प्रकार यशस्वी होताना दिसत आहे. पण तो खरंच यशस्वी झाला की नाही? हे आताच कळणे कठीण आहे.

तिसरा मुद्दा असा की, बटेंगे तो कटेंगे अशी धार्मिक किंवा जातीय विद्वेषाची जी राळ उडविली गेली, त्याचा काही परिणाम झाला आहे का? याचाही विचार करावा लागेल.

अधिक वाचा  मुसळधार पावसाचा २१ जिल्ह्यांना अलर्ट; ताशी ७० च्या स्पीडने येतंय तुफान, येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस

शेतकऱ्यांचा प्रश्नांचा मुद्दा

चौथा मुद्दा शेतकऱ्यांचा प्रश्नांचा आहे. सोयाबिन, कापूस आणि कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांचे आक्रंदन मोठ्या प्रमाणात होते. त्याचा किती परिणाम झाला? हाही मुद्दा विचारात घ्यावा लागेल, असे गिरीश कुबेर म्हणाले.

मतदानोत्तर चाचण्यांचे कल चांगले मनोरंजक

मतदानोत्तर चाचण्यांचे कल चांगले मनोरंजन करत आहेत, असेच म्हणायला हवे. साधारण पाच जागांचा फरक असलेले अंदाज समोर आले तर समजू शकतो. पण काही एग्झिट पोल्सनी ८० ते १५० तर काही पोल्सनी १२० ते १८० जागा मिळतील अशी अतर्क्य आणि अशास्त्रीय पद्धतीने मांडणी केली आहे, असे म्हणता येऊ शकेल. त्यामुळे या चाचण्यांवर किती विश्वास ठेवावा, हा प्रश्नच असल्याचे गिरीश कुबेर म्हणाले.

अधिक वाचा  पुणे विधान परिषद निवडणूक अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे १५३ कोटींचे धनी; जय पवार यांनाही १० कोटींचे उधार दिले 

राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार?

गिरीश कुबेर यांनी शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगताना म्हटले की, या निकालातून राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही वर्षांची दिशा कळू शकेल. शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या संख्येची बेरीज मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक झाली, तर ती कोणाच्या जीवावर झाली? याचे उत्तर मिळेल. जर भाजपाची वाढ न होता दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी वाढत असतील तर कुणीतरी कुणाचीतरी मते खाल्ली आणि कुणाच्या तरी जीवावर कुणीतरी वाढले, याचा अंदाज येऊ शकेल.

विधानसभा निवडणुकीचा निकाल सरकारच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहेच आहे. पण त्याचवेळेला पुढच्या राजकारणाच्या दिशेसाठीही महत्त्वाचा आहे. कारण एकाच्या जीवावर दुसऱ्याने वाढणे, हे पहिला किती काळ सहन करू शकेल? यावर पुढच्या राजकारणाची बेरीज-वजाबाकी अवलंबून असेल, असे गिरीश कुबेर यांनी सांगितले.