कोल्हापूरमध्ये झालेला राडा सगळ्या राज्यानं पाहिला. या प्रकरणानंतर कोल्हापुरात आता काँग्रेसचा पंजा गायब झाला आहे. कारण मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता तिथे काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी उमेदवार नाही. त्यामुळेच सतेज पाटील यांचा संताप अनावर झाला होता, ते जिल्हाधिकारी कार्यालयातच चांगलेच भडकले होते. त्यानंतर संध्याकाळी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना ते भावूक झाल्याचंही दिसलं होतं. त्यानंतर आता कोल्हापुरातील हे वादळ अखेर शांत झालं आहे. यासाठी पुन्हा एकदा सतेज पाटील आणि शाहू महाराज यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.






मधुरिमा राजे यांनी माघार घेण्याचं कारण शाहू महाराज यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. शाहू महाराजांनी लिहिलेल्या या पत्रात “सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी माघार” असं म्हटलं होतं. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातनून मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. याशिवाय अन्य कोणतेही कारण नाही असं स्पष्ट करण्यात आलं.
“एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही असं आमचं आधीच ठरलं होतं. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या, परंतू राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यावर त्यांना विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्व काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता.त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत”
वादळ कसं शांत झालं?
कोल्हापुरात 5 तारखेपर्यंत झालेल्या घडामोडींनंतर काँग्रेसने काल बैठक घेतली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वांमध्ये चर्चा झाली होती. शाहू महाराजांनी यावेळी सांगितलं की, “महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की लवकर ठरवा. म्हणूनच बंटी पाटील यांनी मिटींग घेतली.” यावेळी शाहू महाराजांनी राजेश लाटकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिलं. राजेश लाटकर यांच्यासाठी जोमाने काम करायचंय असं आवाहन यावेळी शाहू महाराजांनी सर्वांना केलं. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत.











