विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वात अगोदर 99 उमेदवाराची जाहीर केलेली यादी पुणे आणि ठाणे या मित्र पक्षांच्या बालेकिल्ल्यात केलेल्या मागण्यामुळे महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अत्यंत किचकट झाला होता. महाराष्ट्रातील सर्व जागांचा तिढा सुटत असताना ठाणे आणि पुणे यासह उर्वरित महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या 18 जागा अडचणीच्या बनल्यामुळे पुन्हा दिली दरबारी बैठकांचं 3 तासांच सत्र पार पडलं आहे. अजित पवार यांची नवाब मलिक यांच्या घरात उमेदवारी देण्याची इच्छा पूर्ण झाली आहे परंतु ठाण्यातील दोन जागांवरती मुख्यमंत्री शिंदे यांचा आक्षेप कायम असल्याने सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील बैठक सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि जागावाटपांची निश्चिती झाल्यामुळे पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जागा कदाचित आजच मध्यरात्री जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील खडकवासला आणि वडगाव शेरी या दोन जागांवरती अदलाबदल करण्यावरून जोरदार रस्सीखेच करण्यात आली. परंतु विद्यमान आमदारांना डावलण्यात आले तर ऐन निवडणुकीत बंडखोरी आणि मतदारसंघ गमावण्याची भीती लक्षात घेऊन तूर्तास हा विषय बासनात गुंडाळण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
राज्यात यंदा विधानसभेच्या रिंगणात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, मनसे, वंचित, एमआयएम, परिवर्तन महाशक्तीसह अनेक लहान पक्ष उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी महायुती आणि मविआच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येकी तीन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे सर्वांसमोरच जागा वाटपाचं मोठं आव्हान होतं. या सगळ्या गोंधळात नाराजांची संख्या देखील वाढली आहे. आतापर्यंत भाजपने 99, एकनाथ शिंदे यांनी 45 आणि अजित पवार यांनी 38 उमेदवारांची नावांची यादी जाहीर केली आहे. तर अद्यापही काही जागांवर चर्चा सुरू आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या काही जागांवर भाजपने आक्षेप घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 45 जागांची यादी जाहीर केली. नाराज असल्याची चर्चा असलेल्या अनेकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये संधी दिली. तर भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र त्यानंतर आता भाजप ज्या जागांवर उमेदवार देणार आहे अशा काही जागांवरही शिवसेनेने आक्षेप घेतल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण पूर्व, ठाणे, ऐरोली आणि मुरबाड या जागांचा यामध्ये समावेश असल्याचं समोर आलं आहे.
भाजपने कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. याला शिवसेनेने विरोध केला आहे. कारण वर्षभरापूर्वी घडलेल्या एका घटनेत गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या महेश गायकवाड या नेत्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे शिवसैनिक सुलभा गायकवाड यांना विरोध करतायत.
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. यावरही शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. त्यानंतर मुरबाडमधून उमेदवारी दिलेल्या शंकर कथोरे आणि ऐरोलीतील गणेश नाईक यांनाही शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध असल्याची अंतर्गत गोटात चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीतही काही जागांवरुन एकमत नसल्याचं दिसतंय. तरी भाजप आता यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.