आंबेडकर-भुजबळ ‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी एकत्र?;  राज्यभर यात्रा फिरणार छगन भुजबळ यात्रेसाठी निमंत्रित

0

राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावरून आता वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात निघणाऱ्या यात्रेला मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी मागणी करत गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन, उपोषण करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे.

त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेत राज्यात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केले आहे. एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडीची ही यात्रा राज्यभरात फिरणार आहे. याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, आरक्षण बचाव यात्रेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित करत आहोत. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि गावांत ही यात्रा निघेल. या यात्रेतून वंचित घटकांचे प्रश्न आणि एससी, एसटी, ओबीसी आरक्षण यावर जनजागृती करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1815389181209723108?t=Ph3O5fZDDX0QP3PJG1dpmQ&s=19

या यात्रेतून ओबीसी आरक्षण वाचवणं, पदोन्नतीमध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षण देण्याबाबत, एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करणेबाबत, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विस्तार करणं, १०० ओबीसी उमेदवारांना निवडणुकीत प्राधान्य देणं आणि ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणं यासारख्या विविध मागण्या आरक्षण बचाव यात्रेतून मांडण्यात येणार आहेत. २५ जुलैला दादरच्या चैत्यभूमीपासून या यात्रेची सुरुवात होईल. त्याचदिवशी ही यात्रा पुण्यातील फुले वाडा येथे पोहचेल.

दरम्यान, आपण ओबीसी नेते आहात, त्यामुळे ओबीसी समाजाच्या हितासाठी तुमचा सहभाग यात्रेत असावा. त्यामुळे २६ जुलैला कोल्हापूरात पोहचणाऱ्या या यात्रेला तुम्ही आर्वजून उपस्थित राहावे किंवा यात्रेदरम्यान कुठल्याही दिवशी तुम्ही सहभागी व्हावं असं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळांना दिले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नाही असा आरोप जरांगेंनी केला आहे. तर छगन भुजबळ राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत