लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. त्याआधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी बोलताना विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी विरोधकांवर हल्लाबोल केला. प्रामुख्याने गोंधळी खासदारांवर त्यांनी निशाणा साधला. निवडणूक संपली असून पुढील साडे चार वर्षे देशासाठी काम करण्याची वेळ आहे. जानेवारी 2029 मध्ये निवडणुका आल्यानंतर तुम्ही मैदानात जा, असे मोदी म्हणाले.






निवडणुकीच्या काळात राजकारण करा, तेव्हा सहा महिने जो खेळ खेळायचा तो खेळा, पण तोपर्यंत देशातील गरीब, शेतकरी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करा, असे आवाहन मोदींनी केले. त्यानंतर काही वेळातच संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला होता.
पंतप्रधान मोदीही लोकसभेत उपस्थित होते. राष्ट्रगीताने कामकाजाला सुरूवात झाली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी दोन मिनिटांतच सभागृहातील बाहेर गेले. त्यानंतर सदस्यांचे प्रश्न सुरू झाले.
काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान मोदींनी संसदेच्या परिसरात मीडियाशी बोलताना सांगितले की, संसदेचे कामकाज सकारात्मक, सृजनात्मक व्हायला हवे. मी देशातील सर्व खासदारांना सांगू इच्छितो की, जानेवारी महिन्यापासून आणच्याकडे जेवढे सामर्थ्य होते, त्याआधारे जेवढी लढाई लढायची होती, ती लढली. जनतेला जे सांगायचे होते, ते सांगितले. कुणी मार्ग दाखवला, कुणी भरकटवले.
आता पुढील पाच वर्षे देशासाठी लढण्याचा निश्चय करा. आपण पुढील साडे चार वर्षे पक्षीय राजकारणापासून दूर राहत देशाच्या हितासाठी संसदेचा उपयोग करू, असे आवाहन मोदींनी केले. हे बजेट अमृतकालातील महत्वाचे बजेट आहे. आजचे बजेच आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल आणि 2047 मध्ये स्वातंत्र्याला शंभर वर्षे होत असताना विकसित भारताचा पाया रचण्याचे काम करेल, असेही मोदींनी सांगितले.











