भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष कोणापासून लपलेला नाही. हे दोन्ही नेते एकमेंकाविषयी नेहमीच राजकीय गणितं हातात ठेवूनच वागतात. देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष संघटनेत राजकीय दबदबा सर्वश्रुत आहे. मात्र पंकजा मुंडे यांचा राजकीय संघर्ष थांबायला तयार नाही.
लोकसभेतील पराभवानंतर आता पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असून, त्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्यावर पंकजाविषयी प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवली. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती आता चर्चेचा विषय ठरली आहे.पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. हा पराभव पंकजा यांच्या समर्थकांना जिव्हारी लागला आहे. काहींनी यामुळे टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे खचल्या आहेत. एकीकडे राजकीय संघर्ष सुरू असताना समर्थकांकडून होत असलेला हा प्रकार, यामुळे पंकजा यांची दुहेरी कसरत सध्या सुरू आहे.
पंकजा यांच्या राजकीय पुर्नवसनासाठी राज्य आणि देश पातळीवरील भाजप पक्षाचे नेते आता सरसावल्याचे सांगितले जात आहे. पंकजा यांना राज्यसभेवर संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र यावर दोन्ही बाजूने कोणीच भूमिका मांडताना दिसत नाही. त्यामुळे पंकजा यांना खरच राज्यसभेवर संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहेत. परंतु त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतेच भाष्य झालेले नाही. त्यामुळे फडणवीस यांची भूमिका नेमकी काय आहे, हे अजून तरी कळू शकलेले नाही. यातच देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांच्याबाबत प्रश्न येताच केलेली कृती चर्चेत आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिस भरती आणि आरक्षणाच्या संघर्षावरून सकाळी पत्रकार परिषदेत भाष्य केले. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना पंकजा यांच्याबाबत प्रश्न विचारताच, त्यांनी तो टाळून काढता पाय घेतला. प्रश्नाबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना फडणवीसांनी पूर्णपणे दुर्लक्ष करत पाठ दाखवून पुढे निघून गेले.
देवेंद्र फडणवीस यांची ही कृती, चर्चेत आली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी देखील या कृतीचा कोणता अर्थ घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. पंकजा मुंडे देखील यावर भाष्य करायला तयार नाहीत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, केंद्रातील भाजपचे वरिष्ठ नेते पंकजा यांच्या राज्यसभेबाबत नेमका काय आणि कधी निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या राज्यसभेतील दोन जागा रिक्त आहे. यावर पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकते, असे सांगितले जात आहे. यासाठी राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून सकारात्मक निर्णय होईल, असे संकेत आहेत.