राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. लोकसभेच्या निकालानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उगारले. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून सगेसोयरे शब्दांसह आरक्षण घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके हे देखील उपोषणावर बसले आहेत. अंतरवली सराटी गावाच्या अगदी जवळ लक्ष्मण हाके देखील ओबीसीसाठी उपोषणावर बसले आहेत. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असून जालनामध्ये वातावरण गरम झाले आहे.






काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर ठाम आहेत. सगेसोयरे शब्दासह मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. जरांगे पाटील म्हणाले, 13 जुलैच्या आधी मराठ्यांना ओबीसीच्या अंतर्गत तेही 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसींना आरक्षण असून ते इतके लढत आहेत. आम्हाला तर आरक्षणच नाही, मग आम्ही किती लढलं पाहिजे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आरक्षण असणारे असे लढायला लागले, तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीने लढतील. आम्हाला विरोध करणाऱ्यापेक्षा ओबीसी नेत्यांनी धनगर आरक्षणावर लक्ष केंद्रीत करावं. तसेच धनगर बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण घ्यायचं ठरवलं तर ते घेऊ शकतात. असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यावर ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांची चोख प्रत्युत्तर दिले आहे.
लक्ष्मण हाके यांचे प्रत्युत्तर
लक्ष्मण हाके हे देखील अंतरवली सराटी गावाजवळ आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर टीका करताना हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना धनगर समाजाचा लय पुळका आलाय का? महादेव जानकर यांना पाडण्यासाठी त्यांनी किती बैठका घेतल्या? कोणाच्याही प्री प्लान अजेंड्यावर काम करायला आम्ही काही जरांगे नाही. असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे. तसेच राज्य सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढू नये व ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी लक्ष्मण हाके यांची मागणी आहे. मागील सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके हे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत.












