वाढत्या तापमानामुळे मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सेवा सुविधा

0

लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहेय वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी मतदारानांही त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मतदारांसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे. मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघाताचा वा अन्य कोणताही त्रास होऊ नये, तसेच कोणालाही त्रास झाल्यास लगेच उपचार मिळावेत यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर आता मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हेसुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.

अधिक वाचा  राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस अडचणीत, ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल… ABVP तक्रारीची गंभीर दखल

वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान देशात आणि महाराष्ट्रातील काही भागात झाले. मात्र वाढत्या तापमानाचा राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील मतदानाव परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदाना घराबाहेर पडण्यास कचरले, काही ठिकाणी कमी मतदान झाले. याच पार्श्वभूमीवर काही उपाययोजना करण्यात येणार आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत 9 हजार 862 मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात 2 हजार 509 तर उपनगरात 7 हजार 353 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा होऊन मतदानाचा टक्का वाढेल , अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

मुंबईत रविवारी उष्णतेची लाट

मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड येथे रविवारी उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला होता. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 38.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे नेहमीपेक्षा 4.4 अंश जास्त होते. तर किमान तापमान 1.9 अंश सेल्सिअसने वाढून ते 27.2 असे नोंदवले गेले. ठाण्यात 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत कुलाबा वेधशाळेत 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, जे नेहमीपेक्षा 1 अंश जास्त होते. किमान तापमानही 1.4 अंश सेल्सिअसने वाढून ते 27.6 असे नोंदवण्यात आले. या शहरांसोबतच राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, पालघर, परभणी, सांगली आणि सातारा येथील तापमान 40अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. या शहरांमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून, रात्रीसुद्धा उष्णतेत वाढ झाली आहे.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश