उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर सातत्याने टीका करणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे लोक पुन्हा भाजपसोबत येण्याचे प्रयत्न करत आहेत. कुठल्याही अतिशर्तीसह हे सर्व यायला तयार आहेत. त्यासंदर्भात दिल्लीत बैठक करण्याचा प्रयत्न देखील केला, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तुम्ही कुठल्या नेत्याकडून आणि नातेवाईकांकडून प्रस्ताव पाठवला हे आम्हाला महाराष्ट्राला सांगावं लागेल, असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे कोण यावर विचार करावा लागेल. 25 वर्षाची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सगळी नितिमत्ता विसरले. मात्र तेच अजित पवार भाजपसोबत आले तर थयथयाट करत आहेत, असंही नितेश राणेंनी म्हटलं. सिंचन घोटाळा हा 2019च्या आधी झाला होता मग टीका आजच का? उद्धव ठाकरेंनी शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी वर 2019 च्या आधी टीका केली. त्यानंतर मांडीला मांडी लावून बसले. आता आदित्य ठाकरेंच्या भविव्याची काळजी आहे, म्हणून सोबत घ्या असं म्हणत असल्याची राणे यांनी म्हटलं.
एकीकडे सामनातून अग्रलेख लिहायचा आणि दुसरीकडे आतून मैत्रीचे प्रस्ताव पाठवायचे, ही दुटप्पी भूमिका ठाकरे गट घेत आहे. महाविकास आघाडी संपलेली आहे. INDIA ची बैठक मुंबईत होणार नाही. त्याआधी 2 घटकपक्ष बाहेर पडलेले असतील, त्यामुळे INDIAची बैठक होणार नाही. जे 2 पक्ष INDIA मधून बाहेर पडतील ते महाराष्ट्रातील असतील, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.