शिवसेनेत फूट पडून ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. नाट्यमय घडामोडी होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे युती सरकार सत्तेवर आले. अनेक चढ-उतारांचा सामना करत या सरकारला आज (ता. ३०) एक वर्ष पूर्ण होत आहे.






त्यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त भावना साभार…
सरकारचे वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन कसे कराल?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारानुसार आम्ही वर्षभरापूर्वी सरकार स्थापन केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अनुभवाचा खुप चांगला फायदा सरकार चालवताना होत आहे.
सुरुवातीपासून आम्ही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आहोत. राज्यातील जनतेला आम्ही प्रत्यक्षात भेटत आहोत. मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझे मंत्रिमंडळातील सहकारी संपूर्ण राज्यभर दौरे करीत आहेत. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे आमची वर्षभराची कामगिरी ही नक्कीच सुराज्याच्या दिशेने जाणारी आहे. तस पाहिलं तर एक वर्ष हा कालावधी फार मोठा नाही..परंतु ही सुरूवात आहे..ती नक्कीच चांगली आणि दमदार झाली आहे.
वर्षपूर्ती होण्याच्या आधी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये आम्ही तीसहून अधिक निर्णय घेतले. राज्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य विम्याचे कवच आम्ही बहाल केले आहे..असे कितीतरी लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत.
तुमच्या सरकारची वर्षभराची दिशा काय राहिली आणि आगामी निवडणूक काळात काय दिशा राहणार आहे?
मी मघाशी म्हटल्याप्रमाणे एक वर्षाचा कालावधी हा जास्त नसला तरी सरकारची कामगिरी किती प्रभावी झाली याचे मूल्यमापन होऊ शकते. तसे झाल्यास मागील अडीच वर्षांत जे झाले नाही ते आम्ही एक वर्षात करून दाखविले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी विकासकामे रखडली होती, ठप्प होती त्या कामांना आम्ही वर्षभरात गती दिली.
सामान्य माणसाचे हित, राज्याचा गतिमान विकास, वेगवान निर्णयांची तितक्याच गतिमानपणे अंमलबजावणी जेणेकरून राज्यातल्या तळागाळातल्या माणसाचा विकास होईल. हीच आमच्या सरकारची दिशा राहीली आहे. निवडणुकीचा विचार डोक्यात ठेवून आम्ही काम करीत नाही…अंतिम ध्येय हे राज्याचा विकास हे आहे..
कोणत्या क्षेत्रांत सर्वांत चांगले काम झाले आहे असे वाटते?
मी म्हणेन सर्वचं क्षेत्रात चांगले काम झाले आहे. शेती, शिक्षण, उद्योगांचा विस्तार, पायाभूत सुविधांची उभारणी, आरोग्य, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, दिव्यांगांचे कल्याण अशा कितीतरी क्षेत्रात राज्य अग्रेसर राहून वाटचाल करीत आहे.
ज्या कारणासाठी सरकार बनवलं ती कारण आता कुठल्या टप्प्यावर आहेत?
महाविकास आघाडीच्या काळात राज्याचा जो विकास रखडला होता त्याला चालना देण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी हे सरकार अस्तित्वात आले आणि हा उद्देश सफल होताना दिसून येत आहे.
आधीच्या युती सरकारच्या काळातील योजना महाविकास आघाडीने बंद केल्या असा आरोप तुम्ही करत होतात आता त्या योजनांची परिस्थिती काय आहे?
जलयुक्त शिवारसारखी फलदायी योजना आघाडी सरकारने बंद केली केली होती. ती आम्ही पुन्हा सुरू केली. त्या माध्यमातून शेतीचा शाश्वत विकास होऊ शकतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळीभागात अक ठिकाणी जमीन ओलिताखाली आली आहे. हे योजनेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आम्ही जलयुक्त शिवार-२ योजना सुरू केली.
मोठे उद्योग महाराष्ट्रात येत नसल्याबद्दलची टीका होत आहे… या पार्श्वभूमीवर दावोसच्या दौऱ्याचे प्रत्यक्षातील फलित काय? कधीपर्यंत उद्योग सुरू होणार?
विरोधकांचे काम टीका करणे आणि त्यांच्या टीकेला चांगल्या कामातून उत्तर देणे हे आमचं तत्त्व आहे. महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत या टीकेला काही आधार नाही.. खरं म्हणजे मी दावोस दौऱ्यावर गेले होतो त्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या एक लाख ५५ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत.
परवाच उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील ४० हजार कोटींच्या गुंतवणुक प्रकल्पांना मान्यता दिली. त्यामुळे एक लाख २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. देशातील पहिला ‘ई बस’ निर्मितीचा प्रकल्प पुण्यात होत आहे. उद्योग बाहेर जात आहेत तर मग ही एवढी गुंतवणूक कुठे होत आहे, याकडे विरोधकांनी लक्ष दिले पाहिजे.













