भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंची समजूत काढल्यानंतर गंगा तिरावरुन सर्व कुस्तीपटू मागे परतले आहेत. कुस्तीपटूंनी शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्याकडे सर्व पदक सोपवले आहेत. केंद्र सरकारचा निषेध म्हणून कुस्तीपटूंनी मेहनतीने कमावलेली सर्व पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व कुस्तीपटू विविध पदकांनी भरलेल्या बॅगा घेऊन हरिद्वार येथे गंगा किनाऱ्यावर जमले होते. परंतु त्यानंतर शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं आणि कुस्तीपटूंनी त्यांचा निर्णय मागे घेतला.






श्रीगंगा सभेनेही केला होता कुस्तीपटूंना विरोध
गंगा हे श्रीक्षेत्र आहे आणि त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, असं आवाहन श्रीगंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केलं. सर्व खेळ हे अमर असतात आणि पदकांना अस्थी समजून विसर्जित करू नका, असंही पुढे नितीन गौतम यांनी म्हटलं होतं. गंगेच्या तिरावर पूजा केली तरी चालेल, पण असे प्रकार करु नका, असं त्यांनी म्हंटलं. गंगेत पदकं प्रवाहित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयाला श्रीगंगा सभेने विरोध केला होता.
28 मे रोजी कुस्तीपटूंनी दिल्ली पोलीस प्रशासनाकडून उद्विघ्न वागणूक मिळाली आणि या प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आम्हाला देशात इतकी वाईट वागणूक मिळत असेल, तर या पदकांचा तरी काय उपयोग? असा प्रश्न विचारत त्यांनी सर्व पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता.
कुस्तीपटू आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की
विनेश फोगट, तिची चुलत बहीण संगीता फोगट आणि साक्षी मलिक यांनी 28 मे रोजी जंतरमंतर येथे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुस्तीपटू आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेचं लोकार्पण करत असताना भर रस्त्यात सुरु होता. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून कुस्तीपटूंना बसमध्ये भरून विविध ठिकाणी नेल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी जंतर मंतरवरील खाटा, गाद्या, कुलर, पंखे, ताडपत्री तसेच इतर पैलवानांचे सामान काढून टाकत तंबूही उखडून टाकले होते. काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, आप, शेतकरी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसने कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध करत मोदी सरकारवर सडकून प्रहार केला.












