बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांचा १५२ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २६ (रामदास धो. गमरे) आरक्षणाचे जनक, आदर्श राजा, थोर समाजसुधारक, सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांचा १५२ वा जयंती महोत्सव शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रतिनिधी आणि विवाह समितीचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्कार समितीचे बौद्धाचार्य मंगेश पवार आणि प्रविण तांबे यांनी आपल्या सुमधुर व गोड वाणीने धार्मिक पूजापाठ संपन्न केले. राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकत असताना “१९०२ साली राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात ५०% आरक्षण घोषित करून ते अंमलात आणले त्यांनी तळागाळातील शोषित, पीडित, मागास, दलीत, शेतकरी ते मराठा समाजालाही त्यांनी आरक्षण दिले परंतु काही लोकांनी त्याला विरोध केल्यानंतर त्यांच्या विरोधाला बळी न पडता आपण घोड्यांची शर्यत लावू असा निर्णय दिला व त्याप्रमाणे घोड्यांची शर्यत लावण्यात आली त्यामध्ये काही जवान, तंदुरुस्त तर काही वयोवृद्ध, आजारी घोडे यांचा समावेश करण्यात आला त्यांच्यापासून काही अंतरावर टोपल्या ठेवून त्यात चारा ठेवण्यात आला आणि शर्यत सुरू करण्यात आली त्यावेळी जे जवान आणि तंदुरुस्त घोडे होते ते साहजिकच चपळतेने धावत जाऊन त्यांनी आपल्या टोपलीतील चारा तर खालाच सोबत दुसऱ्याही टोपल्यातील चारा उष्टा केला त्यावेळी आजारी व वयोवृद्ध काही घोडे टोपली पर्यंत पोहचू शकले नाही व जे हळूहळू पोहोचले त्यांना उष्टा चारा खावा लागला त्यावेळी शाहू महाराज म्हणाले की हीच अवस्था समाजाची आहे आजारी घोड्याप्रमाणे तळागाळातील मागास, शोषित, पीडित, दलीत समाजाची अवस्था आहे म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षणाची गरज आहे तिथूनच आरक्षणाची खरी सुरुवात झाली. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जरी आरक्षण अधिकृत केले असले तरी खऱ्या अर्थाने आरक्षण हे सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांनी दिले आहे म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जात. डॉ. बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक पास झाले त्यावेळी एक महाराचा मुलगा मॅट्रिक पास झाला हे कळताच राजर्षी शाहू महाराज आपला रथ घेऊन स्वतः दबक चाळीत आले तेव्हा बाबासाहेब अवाक झाले व म्हणाले महाराज आपण रयतेचे राजे आहात रयतेने आपल्याकडे आलं पाहिजे आपण मला आदेश दिला असता तर मी स्वतः आपल्या जवळ आलो असतो परंतु बाबासाहेबांचे कौतुक करीत मोठ्या उदारमतवादी शाहू महाराजांनी त्यांचा सत्कार केला त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना शिक्षणासाठी मदत केली; ज्यावेळी बाबासाहेबांना मूकनायक वृत्तपत्र काढायचं होत त्यावेळी त्यांना आर्थिक अडचण आहे ही माहिती शाहू महाराजांना कळताच त्यांनी बाबासाहेबांनी देणगी देऊन मदत केली. माणगावला भरलेल्या महार परिषदेत शाहू महाराजांनी अध्यक्ष स्थान भूषविले होते त्यावेळी अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांनी नमूद केले की यापुढे महार समाजाचा नेता भीमराव आंबेडकर असतील यावरुन शाहू महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी १४ एप्रिल हा बाबासाहेबांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की माझा वाढदिवस साजरा नाही केला तरी चालेल पण माझे राजे राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी सारखी साजरी करा तेव्हापासून बौद्ध समाज शाहू महाराजांची जयंती आपापल्या परीने आपल्या विभागात, परिसरात साजरी करत असतो, बौद्धजन पंचायत समिती ही सालाबादप्रमाणे आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार जोपासण्याचे काम करीत त्याचे जयंती, स्मृतिदिन साजरी करत असते आज उपवर्गीकरण विरोधात महामोर्चा येत्या ३० तारखेला असून नेते मंडळी विभागा-विभागात, शाखे-शाखेत प्रचाराला, सभेला गेले असल्याने जास्त जण कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही म्हणून हा कार्यक्रम मोठ्या सभागृहात न घेता कार्यालयात घेत आहोत, तसेच आपण राजर्षी शाहू महाराजांचे विचार आत्मसात करून आपली वाटचाल केली पाहिजे” असे नमूद करून राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले.

अधिक वाचा  वारजे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ उत्साहात साजरा

निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, आदर्श बौद्धाचार्य आणि शिवडी विभागाचे कोषाध्यक्ष प्रविण तांबे यांनी देखील राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर आपले विचार मांडून राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले. शिवडी गटक्रमांक १३ चे कार्याध्यक्ष संतोष जाधव यांनी आपल्या भाषणात “राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते, बाबासाहेबांनी घटनेत तरतूद करून ते आरक्षण अधिकृत करून घेतले तर आज घडीस ते आरक्षण टिकविण्याचे काम सभापती आनंदराज आंबेडकर करीत आहेत त्यासाठी अ ब क ड उपवर्गीकरणा विरोधात सर्व समाज घेऊन आनंदराज आंबेडकर आज रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अधिकृत केलेले आरक्षण टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आनंदराज आंबेडकरांचे हात मजबूत करूया” असे आवाहन करीत राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले.

अधिक वाचा  महाराष्ट्रात मान्सून अडकला! प्रशांत महासागरातील वादळामुळे वाढलं टेन्शन; मान्सून अति संथ गतीनं पुढे राज्यातील हे जिल्हे कोरडे राहणार

सदर कार्यक्रमास चिटणीस श्रीधर जाधव, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम, राहुल कदम, पतपेढीचे कोषाध्यक्ष गायकवाड, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, समितीचे सेवक प्रदीप तांबे, भाई जाधव, शिवडी गटक्रमांक १३ चे कार्याध्यक्ष संतोष जाधव, दापोली शाखेचे सुनील पवार, आतिश जाधव, सुमंत कासारे, विभागातील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रतिनिधी व विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  पालखीसाठी महापालिकेची जय्यत तयारी; वारकऱ्यांसाठी सर्वंकष सुविधा