मुंबई दि. २८ (रामदास धो. गमरे) उपवर्गीकरणाविरोधातील ३० जून रोजी होणाऱ्या विराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्रमांक २६, २७, २८, २९, ३०, ३१ आणि ३२ मधील सर्व शाखा पदाधिकारी व गटप्रतिनिधींची संयुक्त नियोजन सभा २६ जून रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक हॉलमध्ये सभापती आनंदराज आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.






सदर प्रसंगी आनंदराज आंबेडकर यांनी उपवर्गीकरणाच्या धोरणावर जोरदार टीका करत, संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी समाजाने आता संघटित संघर्ष उभारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेले अधिकार जपण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरले पाहिजे. अन्यथा पुढील पिढी कधीही माफ करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच ३० जूनच्या मोर्चात प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रा. संदेश वाघ यांनी शासनाच्या उपवर्गीकरण धोरणाचे परिणाम सविस्तरपणे स्पष्ट करत, त्याचे सामाजिक आणि संविधानिक दुष्परिणाम समाजासमोर मांडले. तरुण पिढीला या विषयाची जाणीव करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
रिपब्लिकन नेते विनोद काळे यांनी जोगेश्वरी ते दहिसर या परिसरातून किमान दहा हजार नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन समाजाची एकजूट आणि ताकद दाखवावी, असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर सभा यशस्वी करण्यासाठी गट क्र. २६ चे गटप्रतिनिधी मुकुंद महाडिक, गट क्र. २८ चे मंगेश पवार, गट क्र. २९ चे सुनील गमरे, गट क्र. ३१ चे विजय पवार, गट क्र. ३२ चे रवींद्र शिंदे, विश्वस्त गजानन तांबे, माजी विश्वस्त तुळशीराम शिर्के तसेच समन्वय समितीचे संदीप लाखन, शिवाजी मोहिते, राजेंद्र तांबे, प्रकाश कांबळे, मनोहर तांबे, उत्तम जाधव, मंगेश जाधव यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि १२ शाखांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोरेगाव गटाचे गटप्रतिनिधी तथा बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश शांताराम घाडगे यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानत आगामी मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला.












