“तुम्ही पुराणातील गोष्टी सांगणारे, भजन, कीर्तन करणारे लोक”, छगन भुजबळ यांनी धीरेंद्र शास्त्री यांना थेट खडसावले!

0

छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा दावा बागेश्री धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात केला. शिवाजी महाराज यांनी आपण थकलो असल्याचे रामदास स्वामी यांना सांगितल्याचे धीरेंद्र शास्त्री यांनी विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात फिरकू न देण्याचा इशारा शिवप्रेमींकडून देण्यात आल्यावर अखेर धीरेंद्र शास्त्री यांना आपण केलेल्या वक्तव्याविषयी माफी मागणे भाग पडले. परंतु, तरीही शिवप्रेमींचा राग निवळलेला नाही. महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही धीरेंद्र शास्त्रींना त्यांच्या इतिहासविषयक अज्ञानाबद्दल खडसावले.

अलिकडेच एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. नागपूर येथे डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा’ मंदिराचा शिलान्यास सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर आयोजित ‘धर्मसभे’मध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी माहिती दिली. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना यांना आपण आता थकलोय असे वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले.

अधिक वाचा  सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत?

आपला मुकुट काढला, “मी अनेक लढाई लढलो. अनेक युद्ध केले. पण आता पुढे लढायचे नाही. तुम्ही एक दया करा की, हा मुकुट तुम्ही सांभाळा, हे राज्य सांभाळा. तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आता आम्हाला विश्राम हवा आहे. काही दिवस आम्हाला काहीच करायचे नाही”, यावर रामदास स्वामी म्हणाले की, “तुम्ही माझे कोण आहात?,” यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, “मी तुमचा शिष्य आहे”, रामदास स्वामी म्हणाले, “मी कोण आहे?,” यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, “तुम्ही आमचे गुरु आहात”, रामदास स्वामींनी विचारले, “शिष्याचे कर्तव्य काय ?”, यावर शिवाजी महाराज म्हणाले, “जे गुरु आदेश देतील, त्याची अंमलबजावणी करणे”,. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला. आणि म्हणाले, “आजपासून हे माझे राज्य आहे, मी चालवणार. पण तुम्हाला आज्ञा आहे की, तुम्हाला ते सांभाळावे लागणार आहे”, असा किस्सा धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितला होता.

अधिक वाचा  सुनेत्रा पवारांचे भावूक ट्विट, “साहेबांचे आशीर्वाद माझ्यासह बारामतीकरांसाठी लाखमोलाचे…”; प्रकृतीसाठीही प्रार्थना

यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी संताप उसळला. शिवप्रेमींसह विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असहमती दर्शविताना इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नसल्याचे सांगितले.

ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याविषयी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पत्रकारांसी संवाद साधताना संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेटच झालेली नाही, असे इतिहासकार सांगतात. तुम्ही काय इतिहासकार नाहीत. तुम्ही आपले पुराणातील गोष्टी सांगून भजन, कीर्तन करणारे लोक. इतिहासकार वेगळे असतात. ते शेवटपर्यंत जातात. आणि खरा इतिहास शोधून काढतात. त्यामुळे आतापर्यंत असे कोणतेही पुरावे किंवा गोष्टी पुढे आलेल्या नाहीत की, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली, असे म्हणता येईल. असे कुठेही वाचनात आलेले नाही. त्यामुळे अशा गोष्टींना विरोधच झाला आहे.

अधिक वाचा  मुंबई इंडियन्सची गाडी विजयाच्या रुळावर असतानाच नवी गुड न्यूज! CSKच्या सामन्याआधी हा खतरनाक ऑलराऊंडर संघात दाखल

जे वाचनात आलेले नाही, ज्याचा विरोध करण्यात आलेला आहे, जे इतिहासात नाही, असे असतानाही तुम्ही, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली, असे कसे म्हणतात, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराज हे रामदास स्वामींना, “मी आता थकलो आहे, तुम्हीच स्वराज्य सांभाळा”,. मग रामदास स्वामी, नाही, नाही तुम्हीच सांभाळा, असे म्हणतात. हे जर धीरेंद्र शास्ज्ञी सांगत असतील तर याचा राग मराठी माणसांना येणार नाही का ? छत्रपती शिवाजी महाराज थकले असल्याचे म्हणतात. असे जर हे सांगत असतील तर कोणालाही राग येईल. छत्रपती शिवाजी महाराज काय, संभाजी महाराज काय, यांनी या देशासाठी, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली असल्याचे छगन भुजबळ यांनी नमूद केले.