मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यानं उष्मा अधिक भासत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण वारे वाहत असल्यामुळं हा दाह अधिक तापदायक ठरत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसम परिस्थिती असतानाच राज्यात पावसासाठीसुद्धा पूरक स्थिती निर्माण होत असून, त्यामुळं हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या 24 तासांच्या प्रथमानुमानानुसार मुंबईत कमाल तापमानात किंचित घट असेल, तर आकाश निरभ्र असेल. कोकणातही हेच चित्र कायम राहील.






कुठं पावसाचा इशारा?
सोमवारी मध्य महाराष्ट्रासह, विदर्भक्षात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह गोंदियात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देत यंत्रणेनं नागरिकांना सावध केलंय. पावसाच्या याच इशाऱ्याच्या धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील 24 ते 48 तासांमध्ये ही स्थिती बदलणार नसल्याचं चित्र आहे.
पावसाचे वारे आले कुठून?
सध्या मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्याच कारणास्तव राज्यात पावसासाठी पूरक स्थिती पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातीर घाटमाथ्यावरही यामुळं पावसाचा शिडकावा अपेक्षित आहे.
देशभरात पावसाचं सावट, अचानक काय घडलं?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पर्यटनप्रिय अशा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्येसुद्धा पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत असून या राज्यांमध्ये गारपीटीचाही इशारा आहे. दिल्लीपर्यंत हे चक्र कायम राहणार असून, पुढील 3 ते 4 दिवस फार बदल अपेक्षित नाहीत. दरम्यानच्या काळात मध्य भारत, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्येसुद्धा पावसाचा इशारा इसून, जिथं उष्णतेनं ही राज्य होरपळत होती, तिथंच आता पारा घसरू लागला आहे. नव्यानं सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावातामुळं ही स्थिती निर्माण झाली असून, काही दिवसांनंतर पुन्हा हे वारे निवळून उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे.
पश्चिमी झंझावात म्हणजे काय?
पश्चिमी झंझावात म्हणजे वाऱ्याचीच एक प्रणाली. जी उत्तर आणि वायव्य भारतात पावसासह हिमवृष्टी आणि थंड वाऱ्यांचे झोक आणते. याच वाऱ्यांना वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा पश्चिमी विक्षोभ असंही म्हणतात. जिथं वारे आणि ढगांचा समूह पश्चिमेकडून म्हणजेच युरोप आणि भूमध्य सागर क्षेत्रातून अफगाणिस्तान- पाकिस्तान ओलांडत भारतात येतो. हा पश्चिमी झंझावात भारतात आल्यानंतर उत्तर भारतात तापमानात घट होते. मुख्यत्वे डिसेंबर ते जानेवारीमध्ये हे वारे अधिक सक्रिय असतात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हे वारे सक्रिय झाल्यास पाऊस आणि गारपीटीची शक्यता असते.











