इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळांनी भारतातील सर्वसामान्य होरपळले आहेत. हॉटेल व्यावसायिकांपासून जनतेला त्याचे चटके सहन करावे लागत आहे. एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद होत आहेत. अथवा त्यांची सेवा मर्यादीत झाली आहे. तर सामान्य नागरिक घरगुती गॅस मिळत नसल्याने एजन्सीबाहेर भर उन्हात रांगेत उभा ठाकला आहे. सर्वच स्तरावर सर्वसामान्यांची अभूतपूर्व कोंडी झाल्याचे चित्र आहे. तर आखाती युद्धाचे चटके उद्योग विश्वालाही बसले आहेत. अनेक उद्योगांनी टाळेबंदी केली आहे. कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.






ठिंबक सिंचन पाईपचे उत्पादन बंद
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात येणारे क्रूड ऑइल बंद झाले आहे. क्रूड ऑइलचे भाव गगनाला भिडले असून त्याचे थेट परिणाम अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांवर होत आहेत. याचाच बीड मधील ठिबक सिंचन चे पाईप बनवणाऱ्या कंपनीवर देखील थेट परिणाम झाला आहे. क्रूड ऑइल मिळत नसल्याने आणि किंमती दुप्पट, तिप्पट झाल्याने परिणामी बीड मधील ठिबक सिंचन पाईपचे उत्पादन कंपन्यांना बंद करावे लागले आहे. जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही तोपर्यंत परिस्थिती सुरळीत होणार नाही, यामुळे त्यांना सदबुद्धी मिळावी अशी प्रतिक्रिया उद्योजक संतोष उपरे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील १० हजार पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग संकटात
LPG तुटवड्यामुळे राज्यातील १० हजार पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग संकटात सापडले आहेत अशी प्रतिक्रिया राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी नागपूरमध्ये दिली. मध्य-पूर्वेत युद्ध जास्त काळ चालण्याची भीती आहे. सरकारने इतर ठिकाणीवरुन एनर्जी आयात करण्याचा पर्याय शोधावा. व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा झाला नाही तर हजारो उद्योग बंद पडतील. मिडल इस्टमध्ये युद्ध जास्त काळ चालणार, सरकारने इतर ठिकाणीवरुन एनर्जी आयात करण्याचा पर्याय शोधावा अशी मागणी दिपेन अग्रवाल यांनी केली. तर उद्योग बंद झाल्यास ३-४ लाख पेक्षा तास्त रोजगारावर संकट येईल. उद्योगांचं ५० हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार असल्याचे अग्रवाल म्हणाले.
चाकणचीही ‘गती’ मंदावली
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागला आहे. विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत याचे पडसाद उमटत आहेत.या औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्याने सुमारे 30 टक्के कंपन्याचे कामकाज ठप्प झाले असून उर्वरित 70 टक्के कंपन्याचे ऑनलाईन गॅस असल्याने सध्या तरी कामकाज सुरळीत सुरू आहे. युद्धामुळे गॅसचा पुरवठा आणि वाहतूक साखळी विस्कळीत होत असल्याने काही उद्योगांना उत्पादन नियोजनात अडचणी येत आहेत. काही कंपन्यांना लागणाऱ्या पार्ट्स आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यात विलंब होत असल्याने उत्पादनावरही परिणाम जाणवत आहे.
दुसरीकडे, या परिस्थितीचा परिणाम कंपन्यांमधील कॅन्टीन सेवांवरही होताना दिसत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने कॅन्टीन चालवणाऱ्या ठेकेदारांवर खर्चाचा ताण वाढला आहे. त्यामुळे जेवणाचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून काही ठिकाणी कॅन्टीनच्या मेनूमध्येही बदल करण्यात येत आहेत. औद्योगिक वसाहतीतील कामगारांची संख्या मोठी असल्याने कॅन्टीन सेवा ही महत्त्वाची सुविधा मानली जाते. मात्र गॅस उपलब्ध होत नसल्याने कॅन्टीन चालक आणि कंपन्या दोघांनाही आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या चाकण परिसरात दिसत आहे.












