अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाले. यानंतर चार दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी अत्यंत घाईत झाल्याची टीका अनेकांकडून केली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना अत्यंत वेगाने हालचाली घडल्या आणि सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चांना विराम मिळाला. दरम्यान शपथविधीची इतकी घाई का करण्यात आली? कसलीतरी भीती होती का? याबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.






अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची शक्यता चांगलीच बळावली होती. यानंतर भाजपाकडून पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आणि अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणानंतरही राष्ट्रवादीचे नियंत्रण शरद पवारांच्या हाती जाऊ नये, यासाठी ही खेळी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर शोकाकुल वातावरण असताना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या घाईवर विरोधकासह अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या. अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. इतकी घाई का करण्यात आली? कसली भीती होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ज्यावर फडणवीसांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले. याचे उत्तर राष्ट्रवादी पक्ष देईल असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले?
राजकीय “मला असं वाटतं की याचं उत्तर राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष देईल, कारण हा निर्णय त्यांचा आहे. शेवटी शपथविधी कधी करावा, काय करावं? याबाबत तो पक्ष निर्णय घेत असतो. ज्यावेळी इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली, तेव्हा अग्नीसंस्काराच्या आधी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीव गांधींना पंतप्रधान केलं पाहिजे. त्यामुळे परिस्थितीनुसार ते-ते पक्ष निर्णय घेत असतात. तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्याच्यावर इतकी टीका केली जात आहे. टीका करणारे हँडल्स जरी बघीतले तरी लक्षात येते की टीका कुठल्या मानसिकतेतून केली जात आहे,” असे फडणवीस म्हणाले आहेत.











