मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) “सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाल्याने ते सिद्धार्थ राहिले नसून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजेच श्रेष्ठतम, जेष्ठ व वरिष्ठ व्यक्तिमत्व बनले आहेत. इथे ‘वरिष्ठ’ या शब्दाचा अर्थ ब्रह्म म्हणजेच पवित्र व आदर्श माणूस असा आहे परंतु ज्ञानाच्या अभावाने काही मंडळी ब्रम्ह या शब्दाचा अर्थ वेगळा लावतात सत्यार्थात ब्रम्ह म्हणजे स्वच्छ, पद्धतशीर, नीतिमार्गी आणि पारदर्शक कार्य करणारा पुरुष. आपला कारभार चोख, पद्धतशीर, नीतिमार्गाने पारदर्शक असावा जेणेकरून समाजाचे कल्याण, मंगल होईल व समाज सुखसमृद्ध होऊन सुखी राहील असे चोख, पद्धतशीर व पारदर्शक कार्य करतो तो नितीवान पुरुष मनुष्य असला तरी तो देवासमान असतो, बौद्ध धम्माने अमर्याद गुण किंवा उत्कृष्ट भावना असलेली मैत्री (प्रेमळ-दयाळूपणा), करुणा (दयाळूपणा), मुदिता (सहानुभूतीपूर्ण आनंद) आणि उपेक्षा (समता) ही चार तत्व म्हणजे चार ब्रम्हविहार सांगितली आहेत आपण आपल्या आचरणात मैत्रीभावना, सद्भावना निर्माण करणे, भेदभाव दूर करणे, दयाळू-मायाळू, सहानभूतीपूर्ण वागणूक करणे व समतेने जीवन व्यतीत करणे या मार्गाने जो जीवन जगतो तोच श्रेष्ठ, जेष्ठ व वरिष्ठ असतो म्हणजेच तो ब्रम्ह होय” असे प्रतिपादन धम्मचारी बोधीसेन त्रिलोक महासंघ यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास मालिकेचे दहावे पुष्प गुंफत असताना केले.






बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे दहावे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले त्यावेळी स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्या यांनी सढळ हस्ते धम्मदान करीत आपली मदत ऑक्टोबर पर्यंत जमा करावी असे आवाहन केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, यशवंत कदम, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, अतुल साळवी, अरुण मोरे, सिद्धार्थ कांबळे, महेंद्र पवार, मंगेश जाधव, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव, धोंडू परशुराम मोरे, सुगंध कदम, मंगेश पवार, प्रकाश करुळेकर, माजी चिटणीस प्रकाश कासे, जेष्ठ पत्रकार गुणाजी काजिर्डेकर, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











