सर्वसामान्यांसाठी हक्काची असेलल्या लालपरी म्हणजेच एसटीच्या दरात भाडेवाढ करण्याचा घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे तिकीट दरात 14.97 टक्के वाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून ( 24 जानेवारी ) लागू होईल. एसटीसोबत रिक्षा आणि टॅक्सीची 3 रूपयांची भाडेवाढ होणार आहे. ही भाडेवाढ 1 फेब्रुवारी पासून होणार आहे.






राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यांमुळे एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षीत असते मात्र मागील काही वर्षांपासून दरवाढ करण्यात आलेली नाही.
एसटीची भाडेवाड विधानसभा निवडणुकीपूर्वीच अपेक्षी होती. तशी चर्चा देखील होती पण निवडणुका पार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यावर एसटीभाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला. साधारण 2021 पासून एसटी प्रवासी वाहतूक तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असल्याने ही भाडेवाड 18% इतकी अपेक्षीत होती. मात्र, त्यामध्ये काहीशी सुधारणा करत 14.95 टक्के इतकी भाडेवाड करण्यात आल्याचा युक्तीवाद महामंडळाकडून करण्यात येत आहे.
आता रिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागला आहे. ऑटोरिक्षाचा मिटर साधारण 23 वरुन 26 रुपये तर टॅक्सी कमान 28 वरुन 31 रुपये भाडेवाड होणे अपेक्षीत आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या या संभाव्य भाडेवाडीस मंजुरी मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी यांचे मीटर प्रमाणीकर आणि इतर काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर ही भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होईल.
सामान्यांच्या खिशाला कात्री
एसटी आणि रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाडीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. सामान्य नागरिकांना सरकार नेमका कोणता दिलासा देते याबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या भाडेवाढीमुळे सामान्यांकडून संतप्त प्रतिक्रया येत आहे. सरकार कोणता दिलासा देत आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.











