राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

0
25

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. या निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आचारसंहिता लागताच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. तत्पूर्वी समाजाकडून अर्ज करणाऱ्या इच्छुकांशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. तसेच महामंडळांची घोषणा आणि योजना हा केवळ दिखावा आहे. १८ पगडजाती कोणासोबत आहेत, ते तुम्हाला लवकरच कळेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. या घडामोडींमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली मनोज जरांगे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते

मध्यरात्री सुमारे २ वाजता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची आठ दिवसात दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र गुलदस्त्यात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मनोज जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून बोचरी टीका करत आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

दरम्यान, एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतील, असे आम्ही पूर्वीपासून म्हणत होतो; परंतु त्यांना कोणी काम करू दिले नाही, हे माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. त्यांच्या डोक्यात वेगळे प्लॅनिंग होते. ते प्लॅनिंग आपण २० तारखेच्या बैठकीत सांगणार आहोत. भाजपाने रचलेले षड्यंत्र फेल करणार आहे. मराठ्यांना बेदखल करण्याचे काम फडणवीसांनी केले. मराठ्यांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम फडणवीसांनी केले. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचे काम त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे