……म्हणून ‘एनडीए’ हॅट्रिक साधणारच; याकडे दुर्लक्ष होतेय म्हणूनच माध्यमांचे अंदाज चुकतात: विनोद तावडे

0

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील मतदान 20 मे रोजी होत आहे. देशभरात केरळ, तमिळनाडूसारख्या राज्यांमध्ये भाजपच्या मतदारांचा टक्का वाढेल आणि पहिल्यांदाच या राज्यांमध्ये आम्ही चांगले यश मिळवू भाजप ३४० ते ३४५ जागा जिंकेल आणि ‘एनडीए’ चारशे पार नक्की जाईल, असा आत्मविश्वास विनोद तावडे यांनी मुलाखतीत व्यक्त केला.. विनोद तावडे यांनी देशातील प्रचारासह महाराष्ट्रातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केले. या मुलाखतीतील ठळक मुद्दे असे….

देशातील याठिकाणी भाजप नव्याने उभारी घेतेय

आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपच्या जागा वाढत आहेत. दक्षिण भारतामध्ये भाजपने सातत्याने उपक्रम राबविले आहेत. त्याचा फायदा दिसून येत आहे. दक्षिणेत भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान मिळणार आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीबरोबरच तेथील विधानसभा निवडणुकीमध्येही दिसून येईल. देशभरात भाजप ३४० ते ३४५ जागा जिंकेल आणि ‘एनडीए’च्या ४०५ ते ४१० जागांवर विजय होईल,

मविआच्या ‘बुध’वर कार्यकर्तेच नाही

विरोधकांकडे मोदींवर टीकेसाठी मुद्दा नाही. म्हणूनच ते हुकूमशाही, राज्यघटनेत बदल करणे असे मुद्दे समोर आणत आहेत, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. राजीव गांधी यांनी शहाबानो खटल्याच्या वेळी राज्यघटनेत बदल केला, काँग्रेसने राज्यघटनेत ८० वेळा बदल केले. भाजपला २०१४, २०१९ मध्ये पूर्ण बहुमत होते, तेव्हा राज्यघटना का बदलली नसेल, हा प्रश्न विरोधकांना पडत नाही. राज्यघटनेत बदल हा विरोधकांच्या भाषणाचा मुद्दा बनतो, पण तो लोकांना पटत नाही. मविआच्या 30 ते 32 टक्के ‘बुध’वर कार्यकर्ते मिळत नाहीत अशी महाराष्ट्रातील अवस्था आहे.

अधिक वाचा  भाजपमध्ये राज्यसभेसाठी ‘भाऊगर्दी’, दिल्लीत अंतिम निर्णय! यांच्या नावावर शिक्कामोर्तब? ५ नावे चर्चेत

मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन हिंदुत्वापासून ठाकरे दूर

महाविकास आघाडीचे विजय वडेट्टीवार यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालाच नाही, असे वक्तव्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘तुमची लष्करे तय्यबा तर आमची लष्करे शिवबा,’ आहे. पण वडेट्टीवारांनी हुतात्म्यांबद्दल गैरवक्तव्य करून देखील उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. संजय राऊत ‘भगवा दहशतवाद’ म्हणत आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे.

मुस्लिम मते मिळवण्यासाठी लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेससोबत बसून ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. उलट जैतापूरसारख्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि प्रकल्प गुजरातला गेला की आरडाओरड करायची, अशी त्यांची भूमिका राहिली. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने काही केले, की टीका करायची अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे.

महाराष्ट्रातील प्रचाराची पातळी

महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला भाजपला इंडिया आघाडीपेक्षा कमी जागा मिळतील, असे चित्र रंगविण्यात आले. पण, महायुतीतील घटकपक्ष ठाम राहिले. राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत. सध्याच्या वातावरणात महाराष्ट्रात महायुतीच्या चाळीस जागा निवडून येतील. पण, महाराष्ट्रात प्रचाराची पातळी खालावली आहे. नाची वगैरे असे शब्द विरोधकांनी वापरले.

मोदीनाच मतदान

महाराष्ट्रात १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. त्यावेळी महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभेला अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार निवडून दिले तर, त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचे सरकार आले. महाराष्ट्रातील जनता जागरूक आहे. ते यावेळीही मोदींसाठी मतदान करतील, भाजपच्या दोनशे जागा येणार नाहीत, त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असा दावा २०१९ ला विरोधक करत होते. मात्र भाजपने तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या. भाजपचा जो सायलेट मतदार आहे. त्याला गृहीत चरले जात नाही. केवळ जो माध्यमांपुढे बोलतो, व्यक्त होतो त्याच्यावरून अंदाज बांधले जातात. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीचे अंदाज चुकले आहेत.

अधिक वाचा  शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, पत्रकार परिषदेतील मुद्दे सविस्तर वाचा

बिहार, उत्तर प्रदेश

बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी माझे दौरे झालेले आहेत. माध्यमांमधून वर्तविली जाणारी भाकिते योग्य नाहीत. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यांच्या सभांना गर्दी नसते. ते माध्यमांवरून दाखवले जात नाही. पण दुसरीकडे मोदींच्या सभेला गर्दी होते. बिहारमध्ये गेल्या वेळी आम्ही ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. आता नितीशकुमार पुन्हा आमच्या सोबत आहेत. तेथे योग्य उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा यश मिळवू बिहारमध्ये विधानसभेच्या दृष्टीनेही तयारी केलेली आहे.

बाळासाहेबांचीच शिवसेना खरी

पुतण्याला पुढे न करता मुलीला पुढे केले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, उद्धव ठाकरे यांनी महायुतीमध्ये गद्दारी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, नको त्या मुद्यांचा स्वीकार त्यांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते तेच खरी शिवसेना आहे.

उत्तम प्रशासनाची जाणीव भाजपचा कृती आराखडा तयार 

भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी भारत कसा असला पाहिजे, या संकल्पनेवर कृती आराखडा तयार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उंचावलेली भारताची प्रतिमा ते गरिबांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. आमच्या काळात 80 कोटी भारतीयांना मोफत धान्य दिले. गोदामांमध्ये धान्य खराब कधी झाले नाही. मोदी सरकारच्या उत्तम प्रशासनाची जाणीव अशा योजनांमधून देशाला झाली. घर, रस्ते बांधणी, पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला, अन्य उद्योगधंद्यांची भरभराट झाली. सगळ्याच ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच नोकरी नसते. मात्र, रोजगार वाढल्याची जाणीव जनतेत आहे.

अधिक वाचा  अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मोठा कायदा होणार?गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही सरकारकडून हालचालीही सुरू

भ्रष्टाचारमुक्त सरकार

मोदी सरकारच्या दहा वर्षात भ्रष्टाचार झाला नाही. नरेंद्र मोदींनी कोणत्याही कारणासाठी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. आईचे निधन झाल्यानंतरदेखील पंतप्रधान काही तासांत ‘वंदे भारत रेल्वे’ला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी उपस्थित राहतात. आयुष्यभर काम करणाऱ्या अशा माणसासाठी मतदारांनी फक्त एक तास काढून मतदान केले पाहिजे.

“आजचा भाजप वाजपेयीच्या काळासारखा राहिलेला नाही. आजच्या भाजपमध्ये हुकूमशाही आहे. अशा भाजपसोबत आम्ही कधीही जाणार नाही,” असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. तर, “लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एकमेव मुद्दा आहे.

देशाचा कारभार मोदींकडे द्यायचा की ममता बॅनर्जी-राहुल गांधी यांच्यासारख्यांकडे याचा विचार करून जनता मोदीच्या बाजूने मतदान करते आहे. मोदीविरुद्ध बोलण्यासाठी विरोधकांना मुद्दे सापडत नाहीत. त्यामुळेच ते हुकूमशहा, घटना बदलणे असे विषय आणत आहेत,” असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या मुलाखतीत केला.