वाहतुकीची कोंडी सोडविण्यास चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी: मुरलीधर मोहोळ

0

शहराच्या बाजूने जाणाऱ्या महामार्गांमुळे शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि अंतर्गत भागात होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपूल प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेतील भेलकेनगर, गुजरात कॉलनी, आझादनगर, शास्त्री नगर, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर मार्गे मेगा सिटी परिसरात प्रचार फेरीचा समारोप झाला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे नेते किशोर शिंदे, सुधीर धावडे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा पाठक, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील यांचा प्रमुख सहभाग होता.

अधिक वाचा  शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, पत्रकार परिषदेतील मुद्दे सविस्तर वाचा

मोहोळ म्हणाले, “शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आग्रही मागणी मी महापौर असताना केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला.”

मोहोळ पुढे म्हणाले, “त्याच धर्तीवर गतिमान, सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी शहराच्या विविध भागात 21 ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. शहराच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आणि अन्य प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही कामे केली जाणार आहेत.”

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संत गाडगे महाराजांचा १५० व्या जयंती महोत्सव केंद्रीय कार्यालयात संपन्न

नळस्टॉप चौकात पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल

“नळस्टॉप चौकात मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्पातून उभारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक सुसह्य झाली आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून, पुलावरून चार पदरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे.”