गणपती विसर्जनाच्या दिवशी भांडणे सोडवल्याचा राग मनात ठेवून १४ जणांनी लोखंडी गज, तलवार , कोयता, दगडे घेऊन एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला करून तब्बल ९ लाख ८० हजार रोख रक्कम, २ लाखांचे दागिने लुटमार करुन एक चारचाकी व दुचाकी तोडफोड केल्याची घटना बारामतीतील शिरवली येथे घडली. सदर घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सदर घटनेत अक्षय महादेव चव्हाण, सलमान रशिद शेख, सागर महादेव कावळे, बाबु शिवाजी जाधव, रोहन बर्गे, किरण संपत जगताप सर्व जण (रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे) आणि इतर ७-८ जणांविरुद्ध दिलिप पांडुरंग पोंदकुले (रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.






फिर्यादीने आरोपी अक्षय चव्हाण याची गणपती विसर्जनाच्या दिवशी भांडणे सोडवली होती. फिर्यादीच्या घरावर व मोटार सायकलवर २२ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजता दगड पडण्याचा आवाज आला. आरोपी व इतर हातात लोखंडी गज, तलवार कोयता व दगडे घेऊन घरावर हल्ला केला. यावेळी फिर्यादी व त्याचे कुटुंब स्वयंपाक घरात लपले. यावेळी आरोपींनी घरात नासधुस केली. या गोंधळाचा आवाज ऐकून फिर्यादीचा भाऊ नितीन पांडुरंग पोंदकुले यांच्या पोटावर व अनिता राजेंद्र कोकणे हिच्या छातीवर महादेव पांडुरंग पोंदकुले यांच्या गुडघ्यावर दगड मारुन जखमी केले. तसेच पांडुरंग पोंदकुले यांच्या कानावर व जनाबाई पोंदकुले यांच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थ गोळा झाल्यानंतर आरोपी पळून गेले.
फिर्यादी हे स्वयंपाक घरातून बाहेर आले वर घरातील वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसल्या. फिर्यादीने जमिन खरेदीसाठी जमा केलेले ९ लाख ८० हजार रुपये रोख व २ लाखांचे दागिने असा ११ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. शिवाय चारचाकी इर्टिका व ज्युपीटर या दुचाकीची तोडफोड करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.











