दिंडोरी मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. डॉक्टर पवार गेले काही दिवसांपासून कांदा उत्पादकांच्या नाराजीचा सामना करीत आहेत. आता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार आणि सर्वपक्षीयांमध्ये संपर्क व लोकप्रियता असलेले हरिश्चंद्र चव्हाण सध्या नाराज आहेत. पक्षाने आपली उपेक्षा केली.






विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांनीही गेल्या पाच वर्षात आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलेले नाही. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. दिंडोरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आपल्यापुढे उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी करून सामान्य कार्यकर्त्यांच्या नाराजीची भावना व्यक्त करावी असे सांगितले. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. सामान्यतः तीन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे आपल्या नजीकच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक नाराज आहेत. त्यांचा थेट केंद्र सरकारवर रोष आहे. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसण्याची शक्यता आहे. उमेदवार डॉ. भारती पवार यांना प्रचारात देखील त्याचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते माजी खासदार चव्हाण यांच्याबरोबर गेल्यास डॉ. पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. पवार यांचा सामना महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्याशी आहे. महाविकास आघाडीशी संबंधित माकपचे माजी आमदार जे. पी. गावित हे देखील आघाडीच्या धोरणावर नाराज आहेत.
त्यात आता माजी खासदार चव्हाण यांची भर पडली आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून मालती थाविल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकंदरच दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे बंडखोरीचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उमेदवार सध्या अस्वस्थ आहेत.












