दीड हजार रिक्षांवर कारवाई; आरटीओ अधिकाऱ्यांची दोन पथके तयार बसथांब्यांपासून एवढया अंतराचा आहे नियम

0

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीची बस स्थानके किंवा थांब्याजवळ थांबणाऱ्या १ हजार ६२० रिक्षांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पथकाने गेल्या तीन महिन्यांत खटले भरून कारवाई केली आहे. पीएमपीची बसस्थानके किंवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. परंतु रिक्षाचालक त्या नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास पीएमपीच्या मुख्य बसस्थानकांच्या परिसरात येवून बसप्रवाशांची वाहतूक करतात. तसेच बसचालकांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा उभ्या करतात, अशा तक्रारी पीएमपीचे चालक, प्रवासी आणि प्रवासी मंच या संघटनेकडून प्रशानाकडे सातत्याने करण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

त्याची दखल घेऊन पीएमपी आणि आरटीओ अधिकारी यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात पीएमपीचे चार कर्मचारी आणि एक आरटीओ अधिकारी यांचा समावेश आहे. त्यांनी गेल्या ३ महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएलच्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येवून नियम मोडणाऱ्या एकूण १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी दिली.

तसेच स्वारगेट बसस्थानकाचे परिसरात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या रिक्षा, ओला, उबेर, लक्झरी बस आदी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ नुसार १ जानेवारी ते २५ मार्चअखेर ५३० वाहनांवर कारवाई करून वाहतूकीस अडथळा केल्याबद्दल त्यांच्याकडून एकूण रक्कम ३ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पीएमपीच्या बसस्थानकांच्या परिसरात रिक्षा व इतर खाजगी वाहने थांबल्या त्या वाहनांवर आरटीओ पथकामार्फत कारवाई होणार आहे. तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याठिकाणी खासगी वाहने उभी करू नयेत, असे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे.