लोकसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आऱपीआयला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी असून त्याचा स्फोट गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत होण्याची चिन्ह आहेत. तसेच शिर्डीची जागा पक्षाध्यक्ष रामदास आठवलेंसाठी मागण्याचा ठराव यावेळी केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षप्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी, जर आपला मान ठेवला जात नसेल, तर युतीतून बाहेर पडण्याचाही इशारा देण्याची तयारी काही पदाधिकाऱ्य़ांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पण, आपण एनडीए तथा महायुतीतच राहणार असल्याचे स्वत: आठवलेंनीच यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, दबावतंत्राचा एक भाग म्हणून आणि नंतर होऊ घातलेल्या विधानसभेला पुरेशा जागा आणि मंत्रीपद द्यावे यासाठी ही मागणी रेटली जाणार असल्याचे समजते.
पक्षाने दोन लोकसभा जागांची मागणी केली होती. त्यातही शिर्डीची जागा आठवलेंसाठी सोडण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह अजून कायम आहे. त्यामुळे ती मिळावी, असा ठराव उद्याच्या बैठकीत केला जाणार आहे. त्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यानेही सरकारनामाशी बोलताना दुजोरा दिला.तर, भाजपने गृहित धरून एकही जागा लोकसभेला न दिल्याने पक्षात प्रचंड नाराजी असून ती यावेळी प्रकट होणार आहे,असे दुसऱ्या पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत विचारातच घेतले नसल्याने काय भूमिका घ्यायची यावर या बैठकीत चर्चा होईल,असे ते म्हणाले.
दुसरीकडे आरपीआयच्या विरोधाला न जुमानता भाजपने मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रकार म्हणजे रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या जखमी मनावर मीठ चोळण्यासारखे असल्याने त्याचेही पडसाद या बैठकीत उमटणार आहेत. कारण त्याचे संकेत सोशल मीडियावर अगोदरच मिळाले आहेत. म्हणून त्याची तातडीने दखल घेत आठवलेंनी ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे त्यात काय होते, याकडे लक्ष लागले आहे.